प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांची पर्यटनमंत्र्यांकडे मागणी
प्रतिनिधी/ कुडचडे
गोव्यातील विविध पर्यटनस्थळांवरील घटना-घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे अनुशासनहीनता वाढत असून जीवघेणे अपघात होत आहेत. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पर्यटकांच्या सुरक्षेविषयीचे धोरण प्राधान्य देऊन बनवण्यावर भर द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.
दूधसागर धबधब्याजवळ पूल कोसळण्याच्या घटनेने 40 पर्यटकांचा जीव धोक्मयात येण्याच्या घटनेवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी इतर खात्यांच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ न करता आपले खाते कार्यक्षम करण्यावर भर द्यावा. जेटी धोरण बनविण्याची जबाबदारी कॅप्टन ऑफ पोर्ट्स किंवा नदी परिवहन खात्याची आहे. पर्यटन खात्याने आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडण्याची गरज आहे, असा सल्ला पाटकर यांनी यावेळी दिला.
पर्यटन धोरणाची प्रभावीरीत्या अंमलबजावणी का होत नाही, गोवा पर्यटन मास्टर प्लॅनचे काय झाले, स्वदेश दर्शन प्रकल्पांची स्थिती काय आहे, बहुचर्चित हॉट एअर बलूनचे काय झाले, ऍम्फिबियन वाहन कोठे आहे, हॉप ऑन हॉप ऑफ बसेस कुठे आहेत, पर्यटन हेलिकॉप्टर कुठे आहे, सी-प्लेन्स कुठे गेली, असे प्रश्न विचारून, भाजप सरकारने सुरू केलेले हे प्रकल्प कुठे गायब झाले ते पर्यटनमंत्र्यांनी जनतेला सांगावे, अशी मागणी पाटकर यांनी केली आहे.
खंवटे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असताना गोवा विधानसभेत उघड केलेल्या बीच क्लिनिंग घोटाळय़ाचे काय झाले हे गोव्यातील जनतेलाही जाणून घ्यायचे आहे. गोव्यातील समुद्रकिनारे आणि इतर पर्यटनस्थळांवर अनेक बेकायदेशीर गोष्टी घडत आहेत. सत्तेतील लोकांच्या आशीर्वादाने बेकायदेशीर धंदा फोफावला आहे. इव्हेंट मॅनेजमेंट घोटाळय़ात पर्यटन विभागाचे अधिकारी सहभागी आहेत. मार्केटिंग व प्रमोशनल इव्हेंटमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे, असे आरोप पाटकर यांनी केले आहेत. मोदींच्या ‘क्रोनी कॅपिटलिस्ट’ना खूष करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी पर्यटनमंत्र्यांनी आपले प्राधान्यक्रम ठरवावेत. काँग्रेस पक्ष भाजप सरकारला गोमंतकीयांच्या भावना आणि आकांक्षा यांची गळचेपी करू देणार नाही. गोव्याची अस्मिता जपण्यासाठी आम्ही प्राणपणाने लढू, असे त्यांनी म्हटले आहे.









