किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याचीही मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही : शिवनेरीवर शिवजन्मोत्सव उत्साहात
पुणे / प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरिता मंदिरापेक्षाही मोठे आहेत. त्यामुळे त्यांच्या जतन आणि संवर्धनाबरोबरच गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करण्यावरही भर राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे दिली.
किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे, बापूसाहेब पठारे, माजी आमदार अतुल बेनके, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशाताई बुचके आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे योद्धे असण्यासोबतच उत्तम प्रशासक होते. विविध व्यवस्थापनाचे गुऊ होते, शिवरायांनी आपले संपूर्ण आयुष्य जनतेच्या कामी लावले. म्हणूनच आदर्श राजा, जाणता राजा, श्रीमंत योगी म्हणून आपण त्यांचे स्मरण करतो. सध्या स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे विविध विकासकामे सुरू आहेत. त्याचप्रमाणे शिवनेरीचाही विकास करण्यात येत आहे. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवरील अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून कसल्याही प्रकारची अतिक्रमणे राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात येत आहे.
मुगल साम्राज्यात विविध राजे, राजवाडे मांडलिकत्व पत्करत असताना मराठी मुलखात अनाचार, अत्याचार सुरू होते. माँ जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना याविऊद्ध प्रतिकार करून स्वराज्याकडे नेण्याची जबाबदारी दिली. छत्रपती महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून मावळ्यांची फौज तयार केली. यामाध्यमातून देव, देश आणि धर्माची लढाई सुऊ करून स्वराज्य स्थापनेतून खऱ्या अर्थाने भारताचा आत्माभिमान जागृत केला. आजच्या 140 कोटी लोकसंख्येच्या आत्मभिमानी भारताच्या मागे छत्रपती शिवरायांची प्रेरणा असून ते आमचे आराध्य दैवत आहे. येत्या 5 वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा 400 वा शिवजन्मोत्सव साजरा करणार आहोत. किल्ले शिवनेरीवर आल्यानंतर येथील मातीतून स्वराज्याची स्फूर्ती, तेज मिळते. राज्य सेवेची प्रेरणा घेण्याकरिता आम्ही येथे येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
बारा गडकिल्ल्यांचा जागतिक वारसास्थळात समावेश?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील बारा गडकिल्ले नामांकनासाठी निवडले आहेत. हे गडकिल्ले स्थापत्यशास्त्र, जलसंवर्धन, पर्यावरणशास्त्राचा उत्तम नमुना असून याबाबत पॅरिस येथील होणाऱ्या महासभेत येत्या आठवड्यात सादरीकरण करण्यात येणार आहे. हे गडकिल्ले जागतिक वारसास्थळे होतील आणि जगातील लोक ते बघण्याकरिता येतील, अशा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
पर्यटकांना सोयीसुविधा देणार : एकनाथ शिंदे
शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘सर्वसमावेशक कारभार’ डोळ्यासमोर ठेवून काम करण्यात येत असून त्यांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध आहे. गड किल्ल्यांवर येणाऱ्या पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध करून एक सर्किट तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गडकिल्ल्यांसाठी निधी कमी पडू देणार नाही : अजितदादा
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले खऱ्या अर्थाने त्यांची दौलत आहे. ते आपले शक्तीस्थान, स्फूर्तीस्थान असून त्यांचे जतन, संवर्धन करणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्य शासनाच्यावतीने किल्ले शिवनेरी, रायगड, प्रतापगड, सिंहगड, पुरंदर आदी किल्ले परिसरात विविध विकासकामे करण्यात येत असून, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाही. शिवजयंतीच्यानिमित्ताने छत्रपती शिवरायांच्या विचारावर निष्ठा ठेवून काम करण्याचा संकल्प कऊया.








