राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार जुमलेबाज ; खा. सुप्रिया सुळेंचा प्रहार
सावंतवाडी : प्रतिनिधी
राज्यात कुठल्याही भागात गेल्यानंतर गृहमंत्रालयासंदर्भात प्रश्न विचारले जात आहेत. राज्यातील गृहमंत्रालय सर्व बाबतीत फेल ठरले आहे. त्यामुळे गृह मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रालयाच्या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गृहमंत्री पद काढून घ्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सावंतवाडीत हॉटेल मॅंगो मध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत ,पक्ष निरीक्षक शेखर माने ,माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, काँग्रेसचे नेते विकास सावंत ,एडवोकेट दिलीप नर्वेकर, अर्चनाताई घारे -परब ,पुंडलिक दळवी ,रेवती राणे ,सायली दुभाषी, आदी उपस्थित होते. यावेळी, त्यांनी केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारवर जोरदार प्रहार केला. हे सरकार जुमलेबाज सरकार असल्याची टीका त्यांनी केली . महागाई ,बेरोजगारी यासारखे प्रश्न असताना हे सरकार ते सोडवताना दिसत नाही. असे सुळे म्हणाल्या . आगामी निवडणुका राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी म्हणून लढवणार आहोत. तर राज्यात महाविकास आघाडी म्हणून तीनही पक्ष लढवणार आहेत. जागा वाटपाचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात येईल. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चनाताई घारे परब यांना उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे कार्यकर्ते अशी मागणी करू शकतात त्यांच्या मागणीचा सन्मान केला जाईल. परंतु आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय एकत्रित घेण्यात येईल असेही सुप्रियाताई म्हणाल्या. मराठा, धनगर ,लिंगायत ,मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत भाजपाने आश्वासन दिले होते . परंतु, त्यांचे आश्वासन जुमले बाजी ठरली आहे सुप्रिया सुळे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर दोडामार्गामध्ये टीका केली होती यासंदर्भात केसरकर यांनी सुप्रियाताई यांची तक्रार शरद पवार यांच्याकडे करण्यात येईल असे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते . तसेच आपण पक्षासाठी प्रॉपर्टी विकली असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते यासंदर्भात पत्रकाराने सुळे यांचे लक्ष वेधले असता मी केसरकर यांचे नाव घेऊन टीका केलेली नाही. दीपक मधला द जरी मी म्हटला असेल तर मी संपूर्ण वक्तव्य मागे घेते त्यांच्यावर मी टीका काय म्हणून करू त्यांनी प्रॉपर्टी कोणाला विकली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे . आम्हाला त्याचे देणे घेणे नाही . त्यांच्या प्रॉपर्टीच्या विषयात आम्ही कशाला पडू असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या .









