पाणी दूषित झाल्यामुळे गणेशमूर्ती विसर्जनाचा मुद्दा उपस्थित : तातडीने स्वच्छता करण्याची मागणी
वृत्तसंस्था /बेळगाव
कपिलेश्वर तीर्थला पवित्र तीर्थ मानले जाते. या तलावामध्ये गणेश विसर्जन करण्यात येत आहे. मात्र मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे सांडपाणी तलावात मिसळले आहे. तलावातील संपूर्ण पाणी दूषित झाल्यामुळे दूषित पाण्यात विसर्जन कसे करायचे, असा मुद्दा निर्माण झाला आहे. महापालिकेच्या या बेजबाबदारपणाबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटत असून डेनेज पाणी मिसळत असताना याबाबत खबरदारी का घेण्यात आली नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
कपिलेश्वर तलावामध्ये सांडपाणी मिसळत असल्याच्या तक्रारी अनेक वेळा करण्यात आल्या होत्या. मात्र गटारीचे बांधकाम महापालिकेच्यावतीने करण्यात आले होते. पण महापालिकेच्या कामाचा नमुना मंगळवारी रात्री झालेल्या पावसात चव्हाटय़ावर आला आहे. परिसरातील डेनेज वाहिन्या तुंबल्याने कपिलेश्वर रोड आणि परिसरातील सांडपाणी तलावात मिसळत आहे. गटारीचे पाणी तलावात मिसळत असल्याने त्याबाबत आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती. याची दखल घेऊन येथे गटारी बांधण्यात आल्या होत्या. पण तलावात सांडपाणी जाऊ नये यादृष्टीने कोणत्याच उपाययोजना आखण्यात आल्या नाहीत. परिणामी पावसाचे पाणी तलावात जात आहे.
मंगळवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे सांडपाणी तलावामध्ये मिसळले आहे. सद्या गणेशोत्सवामुळे घरगुती श्रीमूर्तींचे विसर्जन या तलावांमध्ये करण्यात येते आहे.
मात्र या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. दीड दिवस, पाच दिवस आणि सहाव्या दिवशी गौरी-गणपतीचे विसर्जन करण्यात आले. पण तलावातील दूषित पाण्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. पाणी दूषित झाल्याने गणेश विसर्जनासाठी भाविकांना रामेश्वर तीर्थ येथे जावे लागले. तलावात सांडपाणी मिसळू नये यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
मंगळवारी सकाळी झालेल्या पावसाचा जोर खूप होता. शहरातील बहुंताश इमारतधारकांनी टेरेसवरील पाणी सांडपाण्याच्या वाहिनीला जोडले आहे. अशातच परिसरातील सांडपाण्याच्या वाहिन्या तुंबल्याने पाणी ओवरफ्लो होऊन रस्त्यावरून वाहत होते. तसेच तलावाच्या चारही बाजूंच्या कठडय़ांची उंची कमी असल्याने रस्त्यावरील पाणी तलावात मिसळले आहे. याबाबतची माहिती मिळताच तलावातील दूषित पाणी उपसा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. याकरिता पंप सुरू करण्यात आले असून बुधवारी सायंकाळपर्यंत तलाव स्वच्छ केला जाईल. पण या दरम्यान घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी फिरत्या वाहनांची सुविधा उपलब्ध केली असल्याची माहिती महापालिकेच्या अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी दिली.
तलावाची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी
महानगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे कपिलेश्वर तलावात दूषित पाणी मिसळल्यामुळे भाविकांना गणपती विसर्जनाला अडथळा निर्माण झाला होता. कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव किरण जाधव यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी स्वतः कपिलेश्वर तलावाकडे जाऊन भाविकांना जक्कीनहोंडा येथे गणपती विसर्जन करण्याची विनंती केली व तात्काळ महानगरपालिकेच्या अधिकाऱयांना दूरध्वनीवरून सदर घटनेची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र महानगरपालिकेच्या अधिकाऱयांनी फोन उचलण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे किरण जाधव यांनी तात्काळ बेळगावच्या जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना सदर घटनेची कल्पना देऊन तात्काळ पर्यायी व्यवस्थेची मागणी केली आहे. तसेच नवीन कपिलेश्वर तलावात गणपती विसर्जनासाठी मुबलक पाणी उपलब्ध करून द्या, जेणेकरून बेळगावच्या जनतेला अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही तसेच कपिलेश्वर तलावाची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी जिल्हा आयुक्तांकडे किरण जाधव यांनी केली आहे.









