चोकाक / प्रतिनिधी
सांगली कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाची शिरोली फाटा ते अंकली फाट्यापर्यंत चाळण झालेली आहे. त्यामुळे प्रवासी व वाहतूकदारांना या मार्गावर वाहतूक करत असताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या निकृष्ठ कामाच्या निषेधार्थ आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने चोकाक ता. हातकंणगले येथे ठेकेदार व राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला.

सांगली कोल्हापूर महामार्ग काही महिन्यापूर्वी राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. जून महिन्यात या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी ८ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. गेल्या चार महिन्यापासून ठेकेदाराच्या व अधिका-यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. अनेक अपघात होवून यामध्ये अनेक प्रवाशी जखमी व मृत्यू झालेला आहे तर हातकंणगले पोलिस ठाण्याच्या दोन महिला पोलिस कर्मचारी सुध्दा या रस्त्यातील खड्यात अपघात होवून जखमी झालेल्या आहेत.
याबाबत काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सायंकाळी राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक पंढरकर यांनी मी जनतेला उत्तर देण्यास बांधिल नाही आपण लेखी तक्रार करा मगच मी कारवाई करतो असे उध्दट बोलल्याबद्दल उजळाईवाडी येथील कार्यालयात अधिकारी यांचेशी वाद झाला. रास्ता रोको व पुतळा दहन आंदोलनाची घोषणा केल्यानंतर स्वाभिमानीच्या धसक्यानंतर एका रात्रीत या महामार्गावरील रूकडी , अतिग्रे , चोकाक , हेर्ले या भागातील खड्डे मुजविण्यासाठी यंत्रणा गतिमान झाली.
आजच्या या आंदोलनात स्वाभिमानी कडून गुरूवार पर्यंत रस्ता दुरूस्त न झाल्यास हातकंणगले येथे दिवसभर सांगली कोल्हापूर महामार्ग चक्काजाम करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी महामार्गाच्या अधिका-यांनी सदर रस्ता मुदतीत पुर्ण करण्याचे व संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, संदीप कारंडे, संतोष जाधव, राजेश पाटील, सागर मादनाईक, ॲड. सुधीर पाटील, ॲड. सुरेश पाटील, सुजित जाधव, मुनिर जमादार, संपत पवार, अण्णा मगदूम यांचेसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.









