रत्नागिरी :
येथील मिऱ्या किनाऱ्यावर गेली पाच वर्षे अडकून पडलेले 35 कोटी रुपये किंमतीचे ‘बसरा स्टार‘ हे जहाज अखेर भंगारात काढण्यात येत आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या परवानग्या मिळाल्यानंतर 2 कोटी रुपयांना हे जहाज विकत घेतलेल्या भंगार विक्रेत्याने गुरुवारपासून जहाजाचे तुकडे करण्यास सुरुवात केली आहे. क्रेनच्या मदतीने जहाजाचे काही भाग तोडून जमिनीवर घेतले जात आहेत. येत्या काही दिवसात पावसाळी वातावरणाचा अंदाज घेऊन सुरक्षितपणे हे जहाज तोडण्याचे काम पूर्ण केले जाईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे ‘सेल्फी पॉइंट’ ठरलेले हे जहाज आता लवकरच इतिहासजमा होणार आहे. मिऱ्या किनाऱ्यावर यापुढे त्याची फक्त आठवण उरणार आहे.
2020 साली आलेल्या वादळात इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ‘बसरा स्टार’ हे जहाज लाटांच्या माऱ्यामुळे मिऱ्या किनाऱ्यावर येऊन धडकले होते. गुजरातहून केरळच्या दिशेने ते जात होते. त्यावेळी एनडीआरएफच्या मदतीने जहाजावरील कॅप्टन आणि खलाशांना सुखरूप वाचवण्यात आले होते. मागील 5 वर्षांपासून समुद्राच्या लाटांचा मारा झेलत हे जहाज किनाऱ्यावर उभे होते. या काळात त्याची डागडुजी न झाल्याने ते पूर्णपणे गंजले होते आणि त्याचा काही भाग वाळूत ऊतला होता. अखेर हे जहाज भंगारात काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
सध्या पावसाळी वातावरणामुळे समुद्र खवळलेला असून मोठ्या लाटा जहाजाला धडकत आहेत. जहाजाचे आधीच दोन भाग झाले असून ते दोन वेगवेगळ्dया दोरखंडांनी बांधून ठेवण्यात आले आहेत. येत्या काही दिवसात पावसाळी वातावरणाचा अंदाज घेऊन सुरक्षितपणे हे जहाज तोडण्याचे काम पूर्ण केले जाईल, असे सांगण्यात आले. भंगार साहित्याच्या संरक्षणासाठी एक वॉचमनही येथे नियुक्त करण्यात आला आहे.








