स्मार्ट मीटरला सक्त विरोध; वीज दरवाढ, अपुऱ्या सोयीसुविधांवर चर्चा
सावंतवाडी । प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आणि सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने वीज ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला आहे. सध्याच्या वीज दरवाढीमुळे कोलमडलेले आर्थिक अंदाजपत्रक आणि महावितरणच्या उदासीन कारभाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हा दरबार महत्त्वाचा ठरणार आहे.हा जनता दरबार शुक्रवार, दिनांक १० ऑक्टोबर रोजी दुपारी ११.०० ते १.०० या वेळेत श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी (मोती तलावाजवळ) येथे आयोजित करण्यात आला आहे.वीज आता शिक्षण, शेती, उद्योग, व्यवसाय अशा सर्वच क्षेत्रांचा अत्यावश्यक भाग बनली आहे. मात्र, महावितरण मंडळाकडील सेवा-सुविधांचा अभाव आणि अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे ग्राहक त्रस्त आहेत. त्यातच अचानक जाहीर झालेल्या वीज दरवाढीने सामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे.या सर्व समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि तक्रारींचे निवेदन सादर करण्यासाठी हा दरबार आयोजित करण्यात आला आहे. संघटनेने सध्या महावितरण कंपनीकडून राज्यात लागू करण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटर, प्रीपेड मीटर आणि इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याच्या धोरणाला सक्त विरोध दर्शवला आहे. ग्राहकांच्या पूर्वपरवानगीशिवाय हे मीटर बसवण्यास विरोध असून, याविरोधात संघटित होण्याची वेळ आली आहे, असे आवाहन संघटनेने केले आहे.महावितरणची अनास्था आणि शासनाचे संभाव्य खाजगीकरणाचे धोरण यामुळे निर्माण होणारी मक्तेदारी आणि त्यातून होणारी ग्राहकांची लूट व पिळवणूक टाळण्यासाठी सर्व वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने या जनता दरबारात उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आणि सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेचे पदाधिकाऱी जिल्हाध्यक्ष संजय लाड जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर संतोष तावडे, असलम खतिब, संजय लाड, गणेश उर्फ बाळासाहेब बोडकर, तुकाराम म्हापसेकर यांनी केले आहे .









