स्वातंत्र्यदिन सोहळा : लाल किल्ल्यावर कार्यक्रम
प्रतिनिधी/ मडगाव
नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी तसेच पंतप्रधानांचे स्वातंत्र्यदिनाचे भाषण ऐकण्यासाठी देशभरातील विशेष निमंत्रितांना दिल्ली येथे बोलावण्यात आले आहे.
या विशेष निमंत्रितांमध्ये व्हायब्रंट व्हिलेजीसचे सरपंच, शिक्षक, परिचारिका, शेतकरी, मच्छीमार तसेच सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प, अमृत सरोवर, हर घर जल या आणि अशाच इतर महत्त्वाच्या सरकारी उपक्रमांचे लाभार्थी आणि यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे.
गोव्यातील कुडचडे येथील ‘हर घर जल योजनेचे’ लाभार्थी योगेश पार्सेकर, दर्शना पार्सेकर आणि सावर्डे येथील माया आर्सेकर, समीर आर्सेकर यांना दिल्ली येथे आमंत्रित करण्यात आले आहे.
सरकारच्या ‘जन भागीदारी’ या संकल्पनेनुसार देशभरातील सर्व स्तरातील नागरिकांना या सोहळ्यासाठी विशेष आमंत्रित म्हणून उत्सवात सहभागी करून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
दुरून पाणी आणण्याचे आमचे श्र्रम वाचले’
‘हर घर जल’ मोहिमेच्या माध्यमातून नळजोडणी मिळाल्यामुळे दिवसाचे किमान दोन तास वाचल्याचे माया आर्सेकर आणि समीर आर्सेकर सांगतात. केवळ वेळच नाही, तर दुरून पाणी आणण्याचे श्र्रमही वाचले आहेत, अशी प्रतिक्रिया आर्सेकर दाम्पत्याने दिली. पाण्याच्या मोठ्या संकटातून आणि त्रासातून सुटका केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
कुडचडे येथील योगेश पार्सेकर यांनी सांगितले की, त्यांच्या आईवडिलांना भल्या पहाटे उठून पाण्यासाठी वणवण करावी लागत असे. ‘हर घर जल’ योजनेच्या माध्यमातून कुटुंबाला आता घरात पाणी मिळत आहे. त्यामुळे कुटुंबाचे श्र्रम वाचले आहेत.









