नवी दिल्ली/ वृत्तसंस्था
दिल्लीच्या एनआयए न्यायालयाने इंडियन मुजाहिद्दीनच्या (आयएम) चार जणांना सोमवारी दोषी जाहीर केले. भारतविरोधी कट रचल्याप्रकरणी दानिश अन्सारी, आफताब आलम, इम्रान खान आणि ओबेद उर रहमान यांना आयपीसी आणि बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायद्याच्या (युएपीए) विविध कलमांखाली दोषी ठरविण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने सप्टेंबर 2012 मध्ये त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 121ए (भारत सरकारविऊद्ध युद्ध पुकारणे) आणि 123 (युद्ध छेडण्याची योजना सुलभ करण्याचा हेतू लपवणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यांच्यावर ‘युएपीए’च्या कलम 17 (दहशतवादी कारवायांसाठी पैसे गोळा करणे), 18 (कट रचणे), 18ए (प्रशिक्षण शिबीर आयोजित करणे), 18बी (दहशतवादी कृत्यांसाठी लोकांची भरती करणे) आणि आणि कलम 20 (दहशतवादी संघटनेचा सदस्य असणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.









