काँग्रेसने विशिष्ट लोकांचे लांगूलचालन करण्यासाठी घटनेच्या अनुच्छेद 370 ची 70 वर्षे जपणूक केली, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील एका प्रचार सभेत ते रविवारी भाषण करीत होते. या अनुच्छेदामुळेच जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाने थैमान घातले होते. तथापि, या देशाच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनादेश दिला आहे. या जनादेशाच्या पाठबळावरच केंद्र सरकारने हा अनुच्छेद निष्प्रभ केला. आता या प्रदेशात मोठ्या प्रमाणात शांतता निर्माण झाली असून लोक निर्भयपणे आपले व्यवहार करीत आहेत. श्रीनगर येथे नुकतेच लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. या मतदाराच्या टक्केवारीने 1996 पासूनचा विक्रम मोडीत काढला आहे. यावरुन लोक निर्भय झाल्याचे दिसून येते, असे प्रतिपादन शहा यांनी केले. जौनपूर जिल्ह्यातील मछलीशहर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बी. पी. सरोज यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. शहा यांनी या सभेत काँग्रेसच्या अनेक धोरणांवर टीकेची झोड उठविली. आमच्यावर समाजात फूट पाडण्याचा आरोप करणारी काँग्रेस स्वत: देशाचे उत्तर आणि दक्षिण असे तुकडे करीत आहे. 1947 मध्ये काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे देशाचे तुकडे झाले होते. तथापि, तेव्हढ्याने काँग्रेसला समाधान वाटत नाही. तिला देशाचे आणखी तुकडे करायचे आहेत. तथापि, या देशातील शहाणी जनता आता तसे होऊ देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Previous Articleपश्चिम बंगालमध्ये खर्गेंची पोस्टर्स फाडली
Next Article शतकांपासून गुहेत राहणारे लोक
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









