मनपाने दखल देण्याची मागणी
बेळगाव : पाईपलाईन रोड येथील मारुती मंदिर ते विजयनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दुतर्फा गटारींचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या 10-12 दिवसांपासून गटारींसाठी खोदाई करण्यात आली आहे. मात्र, काम संथगतीने सुरू आहे. स्थानिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मनपाने याची त्वरित दखल घेऊन काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी रहिवाशांतून केली जात आहे. पाईपलाईन रोड येथील मारुती मंदिर ते अमृत मलम फॅक्टरी येथून विजयनगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दुतर्फा असणाऱ्या गटारींच्या बांधकामासाठी खोदाई करून रस्त्यावरच माती व दगड टाकण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. माती व दगड रस्त्यावर विखरून पडल्याने चालत जाणेही कठीण झाले आहे. दुचाकी घेऊन जाताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. चारचाकी वाहने गल्लीतून घेऊन जाणे अशक्य आहे. त्यामुळे सदर वाहने घरापासून लांबवर ठेवून घरापर्यंत पायपीट करावी लागत आहे. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून सदर गटारींचे काम सुरू केले होते. खोदाई झाल्यानंतर काही ठिकाणी काम सुरू करण्यात आले आहे तर काही ठिकाणी तसेच सोडण्यात आले आहे. तीन ते चार फूट रुंदीप्रमाणे गटारीची खोदाई करण्यात आली आहे. यामुळे रहिवाशांना घरामध्ये ये-जा करताना अडचण जात आहे. खोदाई करून दगड व माती रस्त्यावर टाकण्यात आली आहे. वाहने घरापर्यंत घेऊन जाणे अशक्य होत आहे. वृद्धांना घरातून बाहेर पडणे अडचणीचे होत आहे.
कंत्राटदाराकडून उडवाउडवीची उत्तरे
शनिवारी व रविवारी झालेल्या धुवांधार पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत कंत्राटदाराला विचारले असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याची त्वरित दखल घेऊन रखडलेले काम पूर्ण करण्यात यावे. रस्त्यावर टाकण्यात आलेली दगड व माती हटविण्यात यावी. रहिवाशांना ये-जा करण्यासाठी त्वरित रस्ता मोकळा करून देण्यात यावा. गटारीचे काम त्वरित पूर्ण करून होणारी अडचण दूर करण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांतून केली जात आहे. मनपा अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेऊन संबंधित कंत्राटदाराला गैरसोय दूर करण्यासाठी सूचना करावी, अशी मागणीही केली जात आहे.









