उंब्रज :
कराड तालुक्यातील तासवडे औद्योगिक वसाहतीतील 6 कोटी 35 लाखांच्या कोकेन प्रकरणात तेलंगणा पोलिसांनी घटनास्थळी धडक कारवाई करून सूर्यप्रभा फार्माकेम कंपनी सीलबंद केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शनिवारी 24 रोजी सदरचे ठिकाण सीलबंद करून संशयित आरोपीला घेऊन तेलंगणा पोलिसांची टीम पुन्हा माघारी फिरली आहे. तळबीड पोलिसांनी घटनास्थळी लावलेले कुलूप तोडून नवीन कुलूप तेलंगणा पोलिसांनी लावल्याने या प्रकरणी ट्विस्ट निर्माण झाला आहे.
तासवडे परिसरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला असणारी तेलंगाणा पोलिसांची टीम तपासकार्यात अतिशय गोपनीयता पाळत आहे. नियमानुसार परराज्यात कोणतीही कारवाई करताना संबधित पोलीस अधीक्षक व स्थानिक पोलीस ठाणे यांना कारवाईबाबत अवगत केले जाते. त्यांची मदत घेतली जाते, कारण बाका प्रसंग निर्माण झाल्यास कायदा सुव्यवस्था बिघडू नये, याची काळजी घेतली जाते. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार संबंधित प्रकरणात तेलंगणा पोलीस कमालीचे अलर्ट असून स्थानिक पोलिसांना तपासाचा कोणताही सुगावा लागून देत नसल्याने ताब्यात असणाऱ्या संशयित आरोपीने वेगळीच पोलखोल तर केली नाही ना याबाबत शंका निर्माण होऊ लागली आहे.
अंमली पदार्थांच्या तस्करी तसेच उत्पादन प्रकरणी राज्य सरकारचे धोरण अतिशय कडक असून कोणताही गैरप्रकार खपवून घेणार नाही, याबाबत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस विभागाला निक्षून सांगितले आहे. तासवडे एमआयडीसीतील कोकेन प्रकरणात नक्की काय घडले, याबाबत वरिष्ठ अधिकारी तपास करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याची कुजबुज परिसरात असल्याने पुढे काय कारवाई होणार? याकडे स्थानिकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
दरम्यान, सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर हे एक कर्तबगार आणि धाडसी अधिकारी असून त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक क्लिष्ट गुह्यांचा तपास हिरीरीने केला आहे. तासवडे एमआयडीसीतील कोकेन प्रकरणात स्थानिक पोलिसांनी याबाबत सदरचा तपास करणार असल्याची खात्री दिल्याने एलसीबीच्या तपासाला मर्यादा आल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे कोट्यावधी रुपयांचे अंमली पदार्थ उत्पादन व विक्रीचे जाळे सखोल तपास होऊन कसे उघड होणार? याबाबत खुद्द जिह्याच्या पोलीस खात्यात चर्चा सुरू आहे.
सूर्यप्रभा फार्माकेम कंपनीचा मालक अमरसिंह जयवंत देशमुख हा तेलंगणा पोलिसांच्या ताब्यात असल्याने कोकेन प्रकरणात त्याने आजपर्यंत काय खुलासे केले? याबाबत उलटसुलट चर्चा आहे. जोपर्यंत देशमुखचा ताबा तळबीड पोलिसांना मिळणार नाही, तोपर्यंत याबाबत पुढील तपास मोठ्या कौशल्याने करावा लागणार असून तळबीड पोलिसांच्या ताब्यात असणारे तिघे जण नक्की काय माहिती देतात यावरच सर्व पुढील तपासाची दिशा ठरणार आहे.








