रत्नागिरी :
रत्नदुर्ग किल्ल्यावरील सनसेट पॉईंटवरुन तरुणी खाली पडल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर तरुणी आढळून न आल्याने शोधकार्यासाठी सायंकाळी उशिरा एनडीआरएफचे पथक चिपळूण येथून पाचारण करण्यात आले. घटनास्थळी मुलीची चप्पल आढळून आली असून नेमकी ही तरुणी कोण, याठिकाणी ती कशी आली याबाबतची माहिती समोर आलेली नाही.
- मग तो मृतदेह कोणाचा ?
रत्नदुर्ग किल्ल्याच्या सनसेट पॉईंटवर सुरक्षेसाठी रेलिंग उभारण्यात आले आहे. असे असताना ही तरुणी रेलिंग ओलांडून पलिकडे बसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २९ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास ही तरुणी खाली पडल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. मात्र सनसेट पॉईंटच्या खाली तरुणी पोलिसांना आढळून आली नाही. दरम्यान सकाळी समुद्रकिनारी गेलेल्या तरुणांनी एका मुलीचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांकडून शोध घेतला. मात्र तरुणी आढळून आली नाही.
- एनडीआरएफ पथकालाही अपयश
पावसाळा सुरु असल्याने समुद्राला उधाण आले आहे. त्यामुळे समुद्रात शोधकार्य करताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी पोलिसांकडून चिपळूण येथून एनडीआरएफचे पथक पाचारण करण्यात आले. या पथकाकडून संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली आहे. समुद्राला उधाण असताना अशा परिस्थितीत बोट उतरविणे देखील धोक्याचे असल्याचे एनडीआरफच्या पथकातील सदस्याकडून सांगण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत तरुणी बेपत्ताबाबतची तक्रार शहर पोलिसांत दाखल नव्हती.
- पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे : उदय सामंत
रत्नदुर्ग किल्ल्याच्या सनसेट पॉईंटवरुन तरुणी खाली पडल्याचे समजताच पालकमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी सामंत यांनी सांगितले की, शोधकार्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे असे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. असे असले तरी पर्यटक सुरक्षेसंबंधी दुर्लक्ष करत आहेत.








