मिरज :
शहरात लागोपाठ नऊ बालकांवर मोकाट कुत्र्यांचा हल्ला झाल्यानंतर नागरिक कुत्र्यांच्या दहशतीखाली वावरत आहेत. मोकाट भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवानंतर संतप्त झालेल्या संघटनांसह तक्रारदार नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला असता अधिकाऱ्यांनी श्वानपथक दररोज विविध प्रभागातून २५ कुत्री पकडत असल्याचा दावा केला आहे. मुळात सांगलीसाठी स्वतंत्र आणि मिरज व कुपवाडसाठी एकच डॉगव्हॅन असताना दररोज २५ कुत्री पकडूनही भटक्या कुत्र्यांच्या झुंडी मोकाट कशा? असा सवाल उपस्थित झाला आहे.
शहर आणि परिसरात गेल्या आठवडाभरापासून भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. रेवणी गल्लीसह बोकड चौक, शास्त्री चौक आणि मिरासाहेब दर्गा परिसरात नऊ बालकांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. सर्व जखमी बालकांवर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लागोपाठ अनेक बालकांवर कुत्र्यांचे हल्ले झाल्यामुळे महापालिकेचे श्वान पथक झोपलंय का? असा सवाल केला जात आहे. मात्र, आरोग्याधिकाऱ्यांसह श्वान पथक प्रमुख आणि मुकादमानेही कागदोपत्री काम दाखवले असून, केवळ पगारासाठीच श्वान पथकाकडून प्रभागात फेरफटका मारला जात असल्याचे दिसून येत आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड या तिनही शहरातील भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी महापालिकेकडे केवळ दोनच डॉगव्हॅन आहेत. सांगलीसाठी स्वतंत्र व मिरज व कुपवाडसाठी एकच डॉगव्हॅन आहे. मिरजेत ही डॉगव्हॅन येते कधी आणि जाते कधी? याचा थांगपत्ताच लागत नाही. आठवड्यातून एक-दोनवेळा ही डॉगव्हॅन मिरजेत आलीच तर महापालिकेच्या दारातच तासून तास थांबून असते. दुर्दैव म्हणजे महापालिका प्रवेशद्वाराच्या आत पोर्चमध्ये बसलेल्या कुत्र्यांच्या झुंडीही पकडल्या जात नाहीत. भटक्या कुत्र्यांच्या दहशतीत महापालिका कार्यालयाचाच परिसर असताना इतर प्रभागात काय परिस्थिती असेल? याचा विचार केला पाहिजे. मात्र, श्वान पथकाला याचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसते.
कुत्र्यांच्या हल्ल्यानंतर नागरिकांतून तक्रारी वाढू लागल्या. श्वान पथक गल्लीबोळात फिरत आहे. मात्र, श्वान पकडणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण दिले नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील प्रभाग पाचमध्ये असाच प्रकार घडला आहे. श्वान पकडण्यासाठी पथक आले. पथकात एक वाहन चालक व कुत्री पकडणारे पाच अशी फौज होती. कुत्रे पकडायचे होते, एकच. मात्र तेही त्यांना सापडले नाही. चार ते पाच ठिकाणी सापळा लावूनही कुत्रे फसले नाही. श्वान पथकातील कर्मचाऱ्यांच्या मांडीखालून कुत्रे पळून गेले. त्यानंतर पळून गेलेल्या कुत्र्याला कसल्याही परिस्थितीत पकडणे आवश्यक असताना श्वान पथकाचे कर्मचारी जाग्यावरच फोटो काढून कुत्र्याचा पाहिजे. पाठलाग सोडून निघून गेले. श्वान पथकाचा असा ढिसाळ कारभार असताना महापालिका अधिकाऱ्यांनी दररोज २५ कुत्री पकडत असल्याचा केलेला दावा खरा की खोटा? याचे संशोधन करावे लागेल. खरोखरच दररोज २५ कुत्री पकडले जात असतील तर शहरात भटक्या कुत्र्यांच्या झुंडी मोकाट कशा? याचे उत्तरही महापालिका अधिकाऱ्यांनी दिले.
- मांस विक्रेत्यांवर खापर
मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवानंतर मनपाने शहरातील मांस विक्रेत्यांसह विविध खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या हातगाडी चालकांवर खापर फोडले आहे. रस्त्यावर मांस विकणारे कुत्र्यांना खाऊ-पिऊ घालतात म्हणून मोकाट कुत्री हिंस्र होतात. वास्तविक चिकन, अंडी, मांस, मच्छी विक्रेत्या व्यावसायिकांनी कचरा कुंडीत मांस टाकले तर संबंधीतांवर कारवाई करण्यासह टाकाऊ मांसाहारी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. रस्त्याकडेला व कचऱ्यांच्या कुंड्यांमध्ये मांस पडलेले असताना महापालिकेकडून वेळेत कचरा उठाव होत नाही. त्यामुळे मोकाट कुत्री अशा टाकाऊ मांस पदार्थांवर ताव मारतात.
- मनपा कर्मचाऱ्यांचे सेल्फी विथ कुत्रा…!
नुकताच प्रभाग क्रमांक पाच येथे एक कुत्रे पकडण्यासाठी मनपाच्या श्वान पथकातील सहाजणांची फौज आली. पण कुत्रं जाळ्यात फसलं नाही. मनपाच्या याच कर्मचाऱ्यांनी मग जागेवरच सेल्फी घेऊन कामावर हजर असल्याचे दाखविले. अन् कुत्रे मात्र सोडून दिले. या प्रकारानंतर प्रभाग क्रमांक पाचा येथील नागरिकांतून मात्र त्त्संताप व्यक्त करण्यात येत आहे.
न पकडलेल्या भटक्या कुत्र्यांसोबत श्वान पथकाची फोटोबाजी
कुत्र्यांच्या दहशतीखाली जगताहेत नागरिक
एकाच श्वान पथकाकडे मिरज व कुपवाडचा भार








