ऑनलाईन टीम / तरुण भारत :
फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. या प्रकरणात पुणे आणि मुंबईतल्या कुलाबा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर नोंदवण्यात आलेले गुन्हे मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले आहेत.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना रश्मी शुक्ला या राज्य गुप्तचर विभाग प्रमुख होत्या. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केले होते. पुण्यात काँग्रेस नेते नाना पटोले यांचे फोन कॉल रेकॉर्ड केल्याप्रकरणी तर मुंबईत संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन रेकॉर्ड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर असताना हे एफआयआर नोंदविण्यात आले होते.
पुणे प्रकरणात फिर्यादीद्वारे क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. तर दुसरीकडे, कुलाबा प्रकरणी शुक्ला यांच्यावर खटला चालवण्यास राज्य सरकारनं मंजुरी देण्यास नकार दिला होता. या प्रकरणातील दोन्ही एफआयआर आता रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.








