कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आजपासून प्रारंभ होणार आहे. कोल्हापूर विभागांतर्गत 176 केंद्रावर परीक्षा होणार आहे. सातारा जिल्ह्यात 34 हजार 576, सांगली जिल्ह्यात 32 हजार 830 तर कोल्हापूर जिल्ह्यातील 50 हजार 826 असे सुमारे 1 लाख 17 हजार 330 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
कोल्हापूर विभागीय मंडळाने बारावी परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे. परीक्षेला लागणारे सर्व साहित्य परीक्षा केंद्रावर पोहोचवले आहे. संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरात जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवली जाणार आहे. परीक्षा सुरू होण्याअगोदर परीक्षा केंद्रांवरील भौतिक सुविधांची खात्री जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. परीक्षा चालू असताना जिल्हा प्रशासनामार्फत परीक्षा केंद्राबाहेर व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हयासाठी तालुका व जिल्हास्तरीय भरारी व बैठी पथके परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत. परीक्षेतील गैरप्रकारांना प्रतिबंधासाठी 1982 च्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. शिवाय दरवर्षीप्रमाणे परीक्षा केंद्रातील 500 मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येणार आहेत.








