निष्काळजीपणा कारणीभूत : वीजपुरवठा सुरळीत न केल्यास हेस्कॉमला टाळे ठोकण्याचा इशारा
वार्ताहर/कणकुंबी
कणकुंबी-जांबोटी भागात दररोज अनियमित वीजपुरवठा होत असल्यामुळे नागरिक वैतागले आहेत. मोफत वीज पुरवठ्याचे आमिष दाखवून खंडित वीजपुरवठा करण्यापेक्षा पैसे घ्या आणि नियमित वीजपुरवठा द्या, असे म्हणण्याची वेळ कणकुंबी भागातील नागरिकांवर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जांबोटी, कणकुंबी भागात अनियमित व वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. गेल्या पावसाळ्dयात विजेचा जेवढा लपंडाव झाला नाही त्यापेक्षा अधिक लपंडाव उन्हाळ्यात सुरू आहे. अनेक दिवसांपासून तर दिवसभर वीज नाहीच पण रात्री देखील वीज गायबच आहे.
कणकुंबी भागातील सुरळीत वीजपुरवठ्याच्या बाबतीत हेस्कॉमचे अधिकारी आणि कर्मचारी पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. केवळ पावसाळ्dयात एखाद्या ठिकाणी जंगलमय भागात खांबावर किंवा तारेवर एखादं झाड कोसळले किंवा तार तुटून पडली तरच एक-दोन दिवस विद्युत पुरवठा खंडित होत होता. परंतु यावर्षी गेले आठ-दहा महिने कणकुंबी परिसराबरोबरच जांबोटी भागातील सर्व गावांना अनियमित वीजपुरवठा होत असल्याने नागरिक मेटाकुटीला आले आहेत. वीजपुरवठा नसल्याने प्रत्येक गावातील नळ पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. दळप, कांडप, दूरध्वनी यंत्रणा याबरोबरच विजेवर चालणारी इतर उपकरणे कोलमडल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे.
क्षुल्लक कारणासाठी कणकुंबी भाग अंधारात
जांबोटी-कणकुंबी भागात होणाऱ्या वीज पुरवठ्यात कोणतीही समस्या निर्माण झाल्यास किंवा केवळ एखादी तांत्रिक बिघाड झाल्यास जांबोटी येथूनच कणकुंबी भागातील सर्व विद्युत पुरवठा खंडित केला जातो. सायंकाळी पाच-सहा वाजल्यानंतर कणकुंबी भागात वीजेची समस्या निर्माण झाल्यास लाईनमन जांबोटी मधूनच पुढील सर्व गावांचा वीजपुरवठा बंद करतात. त्यामुळे कणकुंबी भागातील सर्व गावांतील नागरिकांना अंधारात वावरावे लागते. गेल्या महिन्याभरात केवळ एक ते दोन तासच वीजपुरवठा केला आहे. त्यामुळे नागरिकांना अनियमित विजेची डोकेदुखी ठरली आहे. हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधी वेळीच लक्ष घालून कणकुंबी भागात होणारा अनियमित विद्युत पुरवठा सुरळीत करावा अन्यथा खानापूर हेस्कॉम कार्यालयाच टाळे ठोकण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.









