रत्नागिरी / प्रतिनिधी :
एकीकडे कडाक्याचा उष्मा सुरु असताना अशातच जिल्ह्यातील चिपळूण, संगमेश्वर, राजापूरमधील काही भागामध्ये शुकवारी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये चिपळूण-टेरव येथे एका घरावरील पत्रे उडाले तर संगमेश्वरात दाभोळे-कनकाडी परिसरात वादळी वाऱ्यामुळे घरांचे लाखोंचे नुकसान झाले. दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकणात 8 ते 11 एप्रिलदरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आंबा व काजू बागायतदार चिंतेत पडले आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 8 एप्रिल रोजी कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 9 ते 11 एप्रिलदरम्यान तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान जिल्ह्यातील काही भागात शुकवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा जोरदार पाऊस झाला तर उरला-सुरला नफा मिळवून देणारे आंबा, काजूचे उत्पादन पावसाने फुकट जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
चिपळूण : तालुक्यातील सती, चिंचघरी, अनारी, टेरव आदी परिसरात शुक्रवारी सायंकाळी 4 च्या सुमारास वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस झाला. टेरव येथे वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले आहेत. दापोलीतही शुक्रवारी सायंकाळी 7 च्या सुमारास रिमझिम पाऊस सुरू झाला होता. येथे सायंकाळी 4 च्या दरम्यान ढगाळ वातावरण तयार झाले होते.
राजापूरच्या पूर्व परिसरात पावसाची हजेरी
शुक्रवारी सायंकाळी राजापूर तालुक्याच्या पूर्व परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पर्जन्यवृष्टी झाली. या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. गुरूवारी सकाळपासून कडकडीत ऊन पडलेले असताना राजापूर तालुक्याच्या पूर्व भागात दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण तयार झाले व काही वेळातच वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. अचानक कोसळलेल्या या पावसामुळे सर्वांचीच धावपळ उडाली.
संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे, कनकाडी गावाला शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्याचा फटका बसला. सोसाट्याया वाऱ्यामुळे घरावरील पत्रे व कौले उडणे, घरावर झाड कोसळणे अशा घटना घडल्या. यात सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.








