प्रशासनाकडून गांभीर्याने लक्ष देण्याची गरज : भटकी जनावरे, कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी : अस्वच्छतेमुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात
बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मध्यवर्ती बसस्थानक निर्माण करण्यात आले आहे. बसस्थानकात स्वच्छता रहावी, मोकाट जनावरांचा वावर होणार नाही या उद्देशाने बसस्थानक निर्माण करण्यात आले आहे. मात्र मध्यवर्ती बसस्थानकात भटक्या कुत्र्यांचा वावर नित्याचाच झाला असून संपूर्ण बसस्थानक परिसरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून बसस्थानक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत करोडो रुपये खर्च करून मध्यवर्ती बसस्थानक निर्माण करण्यात आले. शहरवासियांसह इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना अनुकूल व्हावे यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तसेच बसस्थानकात स्वच्छता रहावी यासाठी ठिकठिकाणी डस्टबिन ठेवण्यात आले होते. मात्र प्रवाशी याचा वापर करत नसल्याचे दिसून आले. परिणामी प्रवाशी कचरा बसस्थानकातच टाकून जात असल्याचे अनेकवेळा पहावयास मिळाले. यामुळे संपूर्ण बसस्थानक परिसरात कचराच दिसून येत असल्याचे चित्र आहे.
बसस्थानक प्रशासनाने स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर कचरा उचलण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची गरज आहे. मात्र प्रशासनाकडून केवळ काही कर्मचारीच स्वच्छतेचे काम करत असल्याचे दिसून आले. याचबरोबर अस्वच्छतेचा प्रवाशांवर परिणाम होणार नाही याचीही काळजी घेण्याची आवश्यकता असून वेळवर कचरा उचल करण्याची गरज आहे. बसस्थानकात येणारे प्रवाशी गुटखा खाऊन ठिकठिकाणी थुंकत आहेत. यामुळे बसस्थानकातील भिंतींवर लाल पट्टे उठून दिसत आहेत. यासाठी प्रशासनाने वाढीव स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून बसस्थानकातील कचरा काढण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
मध्यवर्ती बसस्थानकात मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे बसचालकांना बस चालवताना अडचणी येत आहेत. तसेच याचा प्रवाशांसह नागरिकांवरही परिणाम होत असून यांचा बंदोबस्त करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. मात्र बसस्थानक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. भटकी जनावरे सर्रासपणे बसस्थानकात वावरत असून बसस्थानकातच ठाण मांडत आहेत. यामुळे बसस्थानकात मोठी अस्वच्छता पसरत आहे. परिणामी प्रवाशांना आरोग्याच्या समस्याही उद्भवण्याचा धोका निर्माण होत आहे. तसेच भटकी कुत्रीही बसस्थानकात फिरत असून प्रसंगी प्रवाशांचा चावा घेण्याचाही धोका निर्माण झाला आहे. यामुळे प्रशासनाने भटक्या जनावरांसह कुत्र्यांचाही बंदोबस्त करण्याची मागणी प्रवाशांसह नागरिकांतून होत आहे.









