नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राष्ट्रपती उमेदवाराच्या निवडीनंतर आता उपराष्ट्रपतीपदी कोणाला विराजमान करायचे? याचा खल सध्या दिल्ली दरबारी सुरू आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवून भाजप शीख समुदायाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करू शकते, असे बोलले जात आहे. भाजपच्या या रणनीतीकडे काँग्रेसला आणखी एक धक्का देण्याचा प्रयत्न म्हणूनही पाहिले जात आहे. तथापि, आरोग्याच्या कारणांमुळे ते उपराष्ट्रपती पदासारखे अत्यंत जबाबदार पद स्वीकारण्याच्या स्थितीत नसल्याचेही बोलले जात आहे. असे असले तरी आपल्या कार्यकर्त्यांना दिशा देण्यासाठी ते आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष ‘पंजाब लोक काँग्रेस’ लवकरच भाजपमध्ये विलीन होऊ शकतो. दोन्ही पक्षांमध्ये तत्वतः करार झाला आहे. येत्या काही दिवसांत याबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो. यामुळे भाजपला पंजाबमध्ये आपला पाया वाढण्यास मदत होऊ शकते, परंतु कॅप्टन अमरिंदर सिंग यांना त्या बदल्यात काय मिळेल यावर अटकळ सुरू आहे. या बदल्यात भाजप त्यांना त्यांच्या मुलीला राजकारणात प्रस्थापित करण्यास मदत करू शकते. कॅप्टन अमरिंदर सिंग मायदेशी परतल्यानंतर आणि त्यांची प्रकृती पाहून यावर अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.
कॅप्टन अमरिंदर सिंग सध्या मणक्मयाच्या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. लंडनमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून सध्या ते विश्रांती घेत आहेत. यावेळी त्यांचे कुटुंबीयही त्यांच्यासोबत आहेत. त्यांना या आजारातून बरे होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. प्रकृतीच्या कारणास्तव कॅप्टनना आपल्या पक्षाला बराच काळ वेळ देता आला नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना पक्षासाठी फारसा वेळ देता न आल्याने प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री राहिलेल्या कॅप्टनना पंजाबमध्ये आपल्या पक्षाला मजबूत स्थितीत आणण्यात अपयश आले. रालोआसोबत युती करून पक्षाने पंजाबमध्ये 28 जागा लढवल्या, परंतु त्यांच्या उमेदवारांना एकही जागा जिंकता आली नाही. बहुतांश उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले. सद्यस्थितीत त्यांची प्रकृती पाहता ते पक्ष फार सक्रियपणे चालवू शकतील असे वाटत नाही. त्यामुळे पक्ष आणि कार्यकर्त्यांचे भवितव्य अंधारात पडले आहे. अशा परिस्थितीत आपल्या जवळच्या सल्लागारांच्या सल्ल्यानुसार कॅप्टन अमरिंदर सिंग आपला पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन करतील, असे बोलले जात आहे.









