कोल्हापूर :
विधानसभा निवडणुकीपुर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तिपीठ महामार्ग प्रकलप रद्द व शेतकऱ्यांची कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, निवडणूका होताच महायुती सरकारने घुमजाव केला आहे. शक्तिपीठ महामार्ग रद्द व कर्जमाफीचा आदेश घेऊनच उपमुख्यमंत्री शिंदेंनी कोल्हापुरात यावे, …अन्यथा कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आला. मुधाळतीट्टा येथील सरवडे येथे होणाऱ्या उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या विजय मेळाव्याला जाणाऱ्या मार्गावर ताफा रोखू, असा इशाराही देण्यात आला.
शासकीय विश्रामगृह येथे शक्तिपीठ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या प्रमुख प्रतिनिधींची बैठक पार पडली. बैठकीत महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या ध्वजारोहणास विरोध करण्याचा निर्धार करण्यात आला.
समितीचे समन्वय गिरीश फोंडे म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचे व कर्जमाफीचे आश्वासनाची पुर्तता न करता शेतकऱ्यांशी गद्दारी केली. राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या करत असताना विजय मेळावा घेणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. 12 मार्चच्या मुंबई मोर्चा देखील एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना भेटले नाहीत. त्यांना कोल्हापुरात फिरकू देणार नाही.
शिवसेना ठाकरे गटाचे विजय देवणे म्हणाले, महायुतीकडून आंदोलने करणाऱ्यांवर दडपशाही होत आहे. याला कोल्हापुरातील जनता भिक घालणार नाही. शक्तीपीठ महामार्ग रद्द व कर्जमाफीचा आदेश काढावा, अन्यथा कोल्हापुरी हिसक्याला सामोरे जावे लागेल. गोकुळ संचालक प्रकाश पाटील म्हणाले, निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना आश्वासन देत त्यांचे पालन न करणे म्हणजे राजकीय संस्कृतीचे पतन आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना 86 हजार कोटी कर्ज काढून शक्तिपीठ महामार्ग कशाला पाहिजे.
शिवाजी कांबळे म्हणाले, सरकार सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये सुरा खुपसण्याचे काम करत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्यासाठी सरकार एजंटना पाठीशी धरून महामार्गाला समर्थन असल्याचे भासवत आहे. कृष्णात पाटील म्हणाले, कोल्हापुरातील आमदार शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेत शेतकऱ्यांना चितावणी देत आहेत. याला एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन आहे. यावेळी सुरेश बन्ने, किसान सभेचे नामदेव पाटील ,दिनकर सूर्यवंशी, वृषभ पाटील, तानाजी भोसले, शिवाजी पाटील, सदानंद कदम, युवराज पाटील, जालिंदर कुडाळकर, वाय एन पाटील, मारुती नलवडे, सर्जेराव पाटील, सदाशिव पाटील आदी उपस्थित होते.
- इंडिया आघाडीची आज बैठक
शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी इंडिया आघाडीच्यावतीने शुक्रवार दि.4 रोजी दुपारी अडीच वाजता सर्किट हाऊस येथे बैठक होणार आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या सूचनेनुसार सरवडे येथे होणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या विजय मेळाव्याच्या शेजारी म्हणजे मुधाळ तिट्टा जवळ शेतकऱ्यांची एक टीम जमेल. दुसऱ्या व तिसऱ्या टीमचा निर्णय वेळप्रसंगी घेण्यात येणार असल्याचे फोंडे यांनी सांगितले.








