वारणानगर प्रतिनिधी
मराठा आरक्षण आणि यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाबाबत विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी पत्राद्वारे केली आहे.
गेल्या ४० वर्षांपासून मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा सुरु आहे. यामध्ये अनेक मराठा बांधवांनी बलिदान दिले. लाखो मराठा बांधवांचे शांतीपूर्ण मार्गाने एकूण ५७ मोर्चे निघाले आणि आता मनोज जरांगे-पाटील यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वसामान्य मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आपल्या समोर आला दुर्देवाने पूर्वी शांततापूर्ण आंदोलनामध्ये लाठीचार्ज करणे आणि हे आंदोलन मोडून काढण्यासाठीची परिस्थिती निर्माण करणे याबाबत मराठा समाजामध्ये तिव्र असंतोष निर्माण झाला आहे. असे आ. कोरे यानी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
शासनाने मनोज जरांगे-पाटील यांच्याकडून आरक्षणाच्या निर्णयासाठी ४० दिवसांचा कालावधी घेतला होता. निर्णय प्रक्रियेतील दिरंगाईमुळे या कालावधीत शासन आरक्षणाचा निर्णय घेणेस असमर्थ ठरले. याची जाणिव शासनाला हा कालावधी मागून घेताना झाली नव्हती का ? अशी भावना मराठा समाजामध्ये निर्माण झाली आणि पुनश्च: मनोज जरांगे- पाटील यांनी अन्न-पाणी त्यागाचं आंदोलन सुरु केले. या सगळ्यामध्ये त्यांच्या प्रकृतीची प्रचंड मोठी काळजी सर्वांनाच वाटत आहे अशी भावना आमदार डॉ. कोरे यानी व्यक्त केली आहे.
मनोज जरांगे – पाटील यांचे उपोषण थांबवण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावून, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत एकमताने निर्णय घेवून त्यांच्या तब्बेतीला कोणताही धोका पोहोचू नये म्हणून हा निर्णय मनोज जरांगे-पाटील यांना कळवून, त्यांचे प्राणांतिक उपोषण ताबडतोब स्थगित करावे अशी विनंती आमदार डॉ. विनय कोरे यानी मुख्यमंत्र्याना दिलेल्या पत्रात केली असून या पत्राच्या प्रती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना देखील दिल्या आहेत.









