सीमाप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना खासदार धैर्यशील माने यांचे पत्र
प्रतिनिधी/ बेळगाव
सीमाप्रश्नासंदर्भात दोन्ही राज्यांमध्ये शांतता रहावी यासाठी कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संयुक्त बैठक बोलवावी, अशी मागणी कोल्हापूरच्या हातकणंगले मतदारसंघाचे खासदार व तज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
बेळगावसह संपूर्ण सीमाभागात कर्नाटक सरकारकडून कन्नडसक्ती केली जात आहे. सीमाप्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. 21 वर्षे उलटली तरी सीमावासियांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने हा प्रश्न न्यायालयाबाहेर सोडवावा. आसाम व मेघालयप्रमाणे बेळगावच्या नागरिकांना न्याय द्यावा. सीमाभागात 15 टक्क्यांहून अधिक मराठी भाषिक असल्याने भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या शिफारशीनुसार त्यांना त्यांचे भाषिक अधिकार द्यावेत.
अद्यापही संयुक्त समिती स्थापन नाही!
दोन्ही राज्यांमध्ये शांतता राहावी म्हणून 4 वर्षांपूर्वी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये दोन्ही राज्यांच्या तीन-तीन मंत्र्यांची एक संयुक्त समिती स्थापन करण्याची सूचना करण्यात आली होती. परंतु ती अद्याप तयार करण्यात आलेली नाही. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संयुक्त बैठक घेऊन शांतता निर्माण करावी, असे पत्र पाठविण्यात आले आहे.









