कोल्हापूर :
शहरातील बाबुभाई परिख पूल अत्यंत जुना, जीर्ण झाला असून वाहतुकीसाठी अपुरा पडत आहे. त्यामुळे बाबुभाई परीख पूलाला समांतर नवा पूल बांधावा, किंवा नवा उड्डाणपूल बांधावा अशी मागणी खासदार महाडिक यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेऊन योग्य तो उपाय केला जाईल, असे मंत्री वैष्णव यांनी ग्वाही दिली.
नवी दिल्लीत सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी खासदार महाडिक यांनी कोल्हापूरशी निगडित रेल्वे प्रश्नांबद्दल मंत्री वैष्णव यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यामध्ये सध्या कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्या गांधीनगर म्हणजेच वलिवडे स्थानकावर थांबत नाहीत. गांधीनगर मधील स्थानिक रहिवासी आणि व्यापारी–उद्योजक यांची सोय लक्षात घेऊन सर्व एक्सप्रेस गाड्यांसाठी पुन्हा गांधीनगरचा थांबा सुरू करावा, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. याशिवाय वंदे भारत एक्सप्रेस आणि सह्याद्री एक्सप्रेस मुंबई पर्यंत न्यावी, अशी मागणीही खासदार महाडिक यांनी केली. कोल्हापूरशी निगडित रेल्वेचे प्रश्न प्राधान्याने लक्ष घालून सोडवले जातील, अशी ग्वाही मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
भुसंपादनामुळे दुहेरीकरणाचे काम रेंगाळले
मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम अधिक गतीने व्हावे, याकडे खासदार महाडिक यांनी लक्ष वेधले. दुहेरीकरणासाठी आवश्यक भूसंपादन झाले नसल्याने हे काम रेंगाळले आहे, असे, मंत्री वैष्णव यांनी सांगितले. त्यावर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून भूसंपादन प्रक्रिया गतिमान करण्यासाठी प्रयत्न केले जाईल, असे खासदार महाडिक यांनी सांगितले.








