बेळगाव: स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून संजीवीनी फौंडेशन आणि अलायन्स इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या तीन वर्षांपासून सामाजिक कर्तव्याचा भाग म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते.
यावेळी उदघाटक आर एम चौगुले यांनी रक्तदान करणे हे अत्यंत गरजेचे असून रक्त ही अशी गोष्ट आहे जी कोणत्याही कारखान्यात तयार होत नसते ते मानवाने मानवाला दिले पाहिजे असे सांगितले.
बिम्स रक्तपेढीचे प्रमुख डॉ. आर जी पाटील यांनी बोलताना बिम्सला रक्त दिल्याने गरीब गरजू रुग्णांसाठी त्याचा वापर होतो, असे सांगितले. मदन बामणे यांनी महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण खूपच कमी असल्याने त्या रक्तदान करू शकत नाहीत यासाठी हिमोग्लोबिन तपासणी शिबिरे आयोजित केली पाहिजेत असे सांगितले व उपस्थित रक्तदात्यांचे आभार मानले. डॉ नविना शेट्टीगार यांनी रक्तदान महादान असे म्हंटले जाते यासाठी प्रत्येक सदृढ व्यक्तींने रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले.
स्वागत आणि प्रास्ताविक विजयालक्ष्मी यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय सरिता सिद्दी यांनी करून दिला. यावेळी संस्थापिका सविता देगीनाळ, सल्लागार सदस्या डॉ सुरेखा पोटे, संचालिका रेखा बामणे, ज्योती अगोळकर, प्रीती चौगुले उपस्थित होत्या.









