रासायनिक खते, कीटकनाशकांचा अतिरेक : माती परीक्षण अन् शेतकऱ्यांमध्ये जागृती करणे काळाची गरज
बेळगाव : बदलते हवामान, रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे जिल्ह्यातील मातीची पोषक द्रव्ये नष्ट होवू लागली आहेत. त्यामुळे काळ्या आईचेच आरोग्य धोक्यात आल्याचे दिसत आहे. लोह, सेंद्रिय, कार्बनसह पोषक घटक कमी होत असल्याने पिकांवर परिणाम होवू लागला आहे. अलिकडे रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीतील पोषक तत्त्वे कमी होवू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनासाठी संघर्ष करावा लागत आहे. शिवाय जमिनीत एकाच प्रकारची पिके अनेक वर्षे घेतली जात असल्याने जमिनीचा पोतही कमी होवू लागला आहे. परिणामी जमीन नापीक होण्याचे क्षेत्र वाढू लागले आहे. अशा परिस्थितीत सेंद्रिय खते उपलब्ध करून देणे आणि शेतकऱ्यांमध्ये जागृती करणे काळाची गरज बनू लागली आहे.
रासायनिक खतांचा अति वापर धोकादायक
जमिनीत एकाच पिकाची सतत लागवड केल्याने सुपीकता कमी होवू लागली आहे. तीन वर्षांतून एकदा तरी माती परीक्षण करणे आवश्यक आहे. मात्र माती परीक्षणाकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होवू लागले आहे. त्यामुळे उत्पादीत मालातील पोषकताही कमी झाल्याचे दिसत आहे. शिवाय अन्नावर रासायनिक खतांचा परिणाम होत असल्याचेही समोर येऊ लागले आहे. त्यामुळेच आरोग्याच्या समस्याही वाढू लागल्या आहेत.
माती परीक्षणाची नितांत गरज
कृषी खात्याने 2023-24 यावर्षात 5 हजार शेतीच्या नमुन्यांची चाचणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी मातीचे संकलन देखील करण्यात आले आहे. विविध रयत संपर्क केंद्रांतून 2235 शेतकऱ्यांकडून मातीचे संकलन करण्यात आले आहे. गतवर्षी करण्यात आलेल्या मातीच्या नमून्यांवरुन जमिनीत झिंक आणि पोषक तत्वांची कमतरता असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेणे गरजेचे आहे.
सुपिकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खत, पालापाचोळा जमिनीतच कुजवा
पिकांच्या पोषक वाढीसाठी पोषक तत्वांची गरज आहे. मात्र शेतकरी केवळ डीएपी आणि युरियाचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे पोषक द्रव्ये कमी होत आहेत. जमिनीतील सुपिकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खत आणि पालापाचोळा जमिनीतच कुजविणे आवश्यक आहे.
मातीचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी मदत करा
माती परीक्षणासाठी जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा ओघ वाढू लागला आहे. शेतकऱ्यांनी जमिनीची पोषकता टिकवून ठेवण्यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. शिवाय तज्ञांच्या सल्ल्यानुसारच मातीचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी मदत करावी.
– शिवनगौडा पाटील-सहसंचालक कृषी खाते
गणेशपूर येथील जैविक केंद्रामध्ये माती परीक्षण केंद्र
बेळगाव-गणेशपूर येथील जैविक केंद्रामध्ये माती परीक्षण केंद्र आहे. या ठिकाणी मातीचे परीक्षण करून शेतकऱ्यांना योग्य तो सल्ला दिला जातो. आतापर्यंत केलेल्या मातीच्या सर्व्हेक्षणानुसार शेतीत पोटॅश आणि फॉस्फरसची कमतरता असल्याचे दिसत आहे. केवळ मातीच नाही तर पाणी आणि पिकांच्या पानांचीही चाचणी करणे आवश्यक आहे.
– महांतेश मुरगोड-सहसंचालक बागायत खाते









