कराड /प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कराड शहर व कराड दक्षिण, उत्तर भाजपच्या वतीने आज तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे व डॉ. अतुल भोसले यांच्यासह शहर व तालुक्यातून बहुतांश पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते
तिरंगा रॅली येथील हुतात्मा स्मारकास अभिवादन करून सुरू झाली. दत्त चौक, आझाद चौक, नेहरू चौक मार्गे ही रॅली कमानी मारुती, पांढरीचा मारुती चौकातून विजय दिवस चौकामार्गे दत्त चौकातून कार्वेनाका या ठिकाणी आली. यावेळी भारत माता की जय…वंदे मातरम… अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यानंतर या रॅलीचे रूपांतर सभेत झाले.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरंगा अभियान संपूर्ण देशात राबवून जगात भारताचा स्वाभिमान उंचावला आहे. देश स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांचे स्मरण यानिमित्ताने संपूर्ण देशात केले जात आहे. पुढच्या पिढीला यानिमित्ताने याबाबत माहिती होण्यास मदत होणार आहे.
जिल्हाध्यक्ष, आमदार जयकुमार गोरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. देशप्रेम जागृत व्हावे. नव्या पिढीला देश स्वातंत्र्याबद्दल अधिक माहिती व्हावी तसेच देश स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी आपले बलिदान दिले त्यांचे स्मरण व्हावे हा मुख्य उद्देश या संकल्पनेतून साकार होणार आहे. या संकल्पनेला संपूर्ण देशभरातून मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. मी स्वतः कराड, सातारा व वाईसह संपूर्ण जिह्यातून अशा रॅलीतून सहभागी होत आहे.








