प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर-गोवा महामार्गावर खानापूरजवळ मलप्रभा नदी पुलावरील कठड्याला धडकल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी सायंकाळी 6 वाजता घडला असून या अपघाताची नोंद खानापूर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे
नंदगड येथील रहिवासी असलेले परशराम गोविंद बेळगावकर (वय 50) हे बेळगाव-उद्यमबाग येथील एका कारखान्यात कामाला जात होते. रोजच्याप्रमाणे आपले काम आटोपून सायंकाळी उद्यमबाग येथून नंदगडकडे आपल्या दुचाकीवरून येत असताना खानापूरजवळील मलप्रभा नदीवरील पुलावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने कठड्याला जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या दुचाकीवर मागे बसलेला नंदगड येथील अमोल सीताराम अष्टेकर (वय 20) हा गंभीर जखमी झाला आहे. बेळगाव येथील सरकारी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले आहे.
अपघातस्थळी खानापूर पोलिसांनी पंचनामा केला आहे. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. परशराम यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. परशराम यांच्या वडिलांचा हॉटेल व्यवसाय असून अपघाती निधनाने नंदगड गावावर शोककळा पसरली आहे.









