रिंगरोडबरोबरच सर्कलमुळे शेतकऱयांना भूमीहीन करण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी/ बेळगाव
रिंगरोडनंतर आता बेन्नाळी आणि होनगा शेतकऱयांवर मोठी कुऱहाड कोसळणार आहे. रिंगरोडला जमीन घेतली जाणार आहे. त्यानंतर या परिसरात मोठा सर्कल करण्यासाठी तब्बल 100 एकर जमीन घेतली जाणार आहे. यासाठीही काही सर्व्हे क्रमांक या रिंगरोडमध्येच प्रसिद्ध केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली असून कोणत्याही परिस्थितीत आम्ही सुपीक जमीन देणार नाही, असा निर्धार शेतकऱयांनी केला आहे.
बेन्नाळी, होनगा या परिसरातील शेतकऱयांच्या जमिनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 मध्ये गेल्या. काही जणांची घरे गेली. त्यानंतर शेतकऱयांनी पुन्हा नव्याने घरे बांधली. आता रिंगरोडच्या नावाखाली जमीन घेण्यात येणार आहे. याचबरोबर कोणत्याही प्रकारची गरज नसताना तब्बल 100 एकरचा सर्कल तयार करण्यासाठी या दोन्ही गावांतील जमीन घेतली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱयांमध्ये खळबळ उडाली आहे.
रिंगरोडसाठी आपला विरोध होताच. मात्र आता या सर्कलसाठी घेण्यात येणारी ही सुपीक जमीन आम्ही देणार नाही, असे स्पष्ट केले आहे. याबाबत तातडीने बैठक घेतली. यावेळी एपीएमसीचे माजी अध्यक्ष आनंद पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य किरण पाटील, ऍड. भैरु टक्केकर यांच्यासह इतर काहीजणांनी या बैठकीमध्ये आपले विचार व्यक्त केले. कशाप्रकारे त्याविरोधात लढा द्यायचा, याबबतही चर्चा करण्यात आली. होनगा औद्योगिक वसाहत, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4, यासाठी जमिनी घेण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता रिंगरोड आणि या सर्कलसाठी शेकडो एकर जमीन घेतली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी भूमीहीन होणार आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थितीत जमीन द्यायची नाही, याचबरोबर त्याविरोधात न्यायालयीन लढाई आणि रस्त्यावरील लढाई लढण्याचा निर्धारही या बैठकीत करण्यात आला.
या बैठकीला नागेश पाटील, तानाजी पाटील, सहदेव पाटील, मारुती पाटील, अशोक पाटील, देवाप्पा पाटील, परशराम पाटील, कल्लाप्पा पाटील, यल्लेश पाटील, विलास यल्लण्णाचे, प्रशांत यल्लण्णाचे, दर्शन पाटील, तुकाराम पाटील, यल्लाप्पा पाटील, सुरेश टक्केकर, सुरे पाटील यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि केंद्र सरकारच्या आदेशानुसार प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णवर यांनी ही नोटिफिकेशन जारी केली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्य शेतकऱयांच्या सुपीक जमीनी या रस्त्यामध्ये जाणार आहेत. केवळ राजकीय व्यक्तींना याचा लाभ व्हावा, यासाठी हा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप यापूर्वी शेतकऱयांनी केला होता. त्यानंतर आता पुन्हा शेतकऱयांवर कुऱहाड कोसळली आहे. दरम्यान बेन्नाळी आणि होनगा येथील शेतकऱयांवर मोठे संकट आले असून 100 एकर जमीन बळकावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता न्यायालयीन लढाईबरोबरच रस्त्यावरील लढाई लढण्याचे ठरविण्यात आले आहे.
यापूर्वीही प्रसिद्ध झाली होती नोटीफिकेशन
यापूर्वी या रिंगरोडसाठी शेतकऱयांच्या जमिनीसंदर्भात नोटीफिकेशन देण्यात आले होते. त्याविरोधात शेतकऱयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याठिकाणी न्यायालयाने रस्त्याला स्थगिती दिली होती. आताही आपणाला त्याच पद्धतीने न्यायालयीन लढाई लढावी लागणार आहे. त्यासाठी शेतकऱयांनी एकजुटीने राहून विरोध करणे महत्त्वाचे आहे. न्यायालयीन लढाईसाठी लागणारी कागदपत्रे तातडीने देणेही गरजेचे आहे. तेव्हा शेतकऱयांनी गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन ऍड. भैरु टक्केकर यांनी केले आहे.









