भाजी-भाकरी उपलब्ध होणार, कष्टकऱ्यांना दिलासा
बेळगाव : काँग्रेस सरकार सत्तेत आल्यापासून इंदिरा कँटीनला अच्छे दिवस आले आहेत. शिवाय दैनंदिन लाभ घेणाऱ्यांची संख्यादेखील वाढू लागली आहे. त्यामुळे इंदिरा कँटीनच्या आवारात वर्दळ वाढताना दिसत आहे. गोरगरीब जनतेला नाष्टा आणि जेवणाची सोय व्हावी, यासाठी शहराच्या विविध ठिकाणी इंदिरा कँटीनची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, अनुदान आणि इतर कारणांमुळे मध्यंतरी या कँटीनना उतरती कळा लागली होती. मात्र आता पुन्हा इंदिरा कँटीनला चांगले दिवस येऊ लागले आहेत. शहरातील बसस्टँड रोड, एपीएमसी आवार, आझमनगर, जिल्हा रुग्णालय, क्लब रोड, गोवावेस सर्कल, नाथ पै सर्कल, कणबर्गी रोड आदी ठिकाणी इंदिरा कँटीन आहेत. यापैकी क्लब रोडवरील जिल्हा रुग्णालय व बसस्टँड रोड येथील कँटीनमध्ये नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. नागरिकांना केवळ पाच रुपयात नाष्टा, दहा रुपयात जेवण उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे गोरगरीब हमाल, कष्टकऱ्यांना सोयीस्कर होऊ लागले आहे. शिवाय नाष्टा व भोजनाचा प्रश्नदेखील मार्गी लागला आहे. शहरात कष्टकरी कामगारांची संख्या अधिक आहे. मात्र, नाष्टा व जेवणाअभावी अशा नागरिकांचे हाल होतात. अशा परिस्थितीत ही इंदिरा कँटीन आधार ठरू लागली आहेत. मात्र, मध्यंतरी इंदिरा कँटीन ओस पडत होती. मात्र, आता काँग्रेस सत्तेवर आल्यापासून कँटीनचे पुनरुज्जीवन होऊ लागले आहे. शिवाय नाष्टा आणि जेवणाबरोबर भाजी-भाकरी देण्याची योजना आखली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून पाठ फिरविलेल्या इंदिरा कँटीनकडे आता पावले वळताना दिसत आहेत.









