मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा : सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय
बेळगाव : बेळगावमधील सकल मराठा समाजाच्यावतीने मुंबई येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे. तसेच यासाठी रविवार दि. 31 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी उद्यान येथून धर्मवीर संभाजी चौकपर्यंत भव्य मोर्चा काढून आंदोलनाला समर्थन दिले जाणार असल्याची माहिती शुक्रवारी आयोजित सकल मराठा समाजाच्या बैठकीत देण्यात आली.
जत्तीमठ येथे झालेल्या बैठकीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली. मराठा समाज हा आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. महाराष्ट्रासह बेळगावमध्येही मराठा समाजाची हीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात झालेल्या मराठा मोर्चांवेळी बेळगावच्या मराठा समाजाला सामावून घेण्यात आले होते. त्यामुळे मुंबई येथे सध्या सुरू असलेल्या मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यात आला आहे.
मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी बेळगावमधील एक शिष्टमंडळ मुंबई येथे जाण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा करण्यात आली. बेळगावमधील मोर्चा झाल्यानंतर मुंबईला जाण्याचा विचार केला जाणार आहे. तसेच ओबीसींना आरक्षण देतेवेळी मराठा समाजाने पूर्णपणे सहकार्य केले होते. तसेच सहकार्य ओबीसी समाजाने आता मराठा समाजाला करावे, कोणीही मराठा समाजावर आगपाखड करण्याचा प्रयत्न करू नये, असे सांगण्यात आले.
बैठकीदरम्यान प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, रणजीत चव्हाण-पाटील, रमाकांत कोंडूसकर, मोतेश बार्देशकर, डी. बी. पाटील, अनिल आमरोळे, आनंद आपटेकर, नेताजी जाधव, संजय मोरे, अनिल पाटील, शिवराज पाटील, विलास घाडी यासह इतरांनी मार्गदर्शन केले. यावेळी एम. वाय. घाडी, बाबू कोले, दत्ता उघाडे, महेश जुवेकर, सुनील जाधव, रावजी पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.









