प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव तालुका परिसरात वातावरणाच्या बदलामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. थंडीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशातच मध्यंतरी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. काही दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली होती. याचा परिणाम पिकांवर काही प्रमाणात झाला. सध्या बेळगावचा पारा 19 अंशावर येऊन ठेपला असून रात्री थंडी पडू लागली आहे. तर मीचौंग वादळामुळे बेळगावसह इतर परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.
चार दिवसांपूर्वी थंडीने नागरिक हैराण झाले होते. थंडीचा पारा वाढत असतानाच पुन्हा ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी सर्वसामान्यांना आरोग्याची काळजी घ्यावी लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागात थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. ऑक्टोबर गरमीचे तापमान ओसरल्यानंतर एकदम गारवा निर्माण होतो. यामुळे आजारांना आमंत्रण मिळत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. यासाठी आपण दक्षता घेणे गरजेचे आहे.
मागील काही दिवसांपूर्वी वातावरणात अचानक बदल होऊन पावसाने हजेरी लावली होती. ऑक्टोबर महिन्यापासून आतापर्यंत या हवामानात वारंवार बदल होत आहे. यामुळे विशेषकरून सर्दी, ताप, खोकला होतो. थंडीमुळे सर्दी कमी होत नसल्याने कफ वाढून श्वासोच्छवास करण्यास त्रास होतो, यासाठी काळजी घ्यावी. मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने थंडी गायब झाली आहे. याचा फटका साऱ्यांना बसत आहे. कधी थंडी, कधी उन तर कधी पाऊस असे संमिश्र वातावरण निर्माण होत आहे.
थंडीमुळे ग्रामीण भागात शेकोट्याही पेटू लागतात. मात्र आता ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांची घाईगडबड सुरू आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक जण गरम कपडे खरेदी करण्याकडेही वळले आहेत. ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत आहेत. झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. याचबरोबर कडधान्य पिकांवरही याचा परिणाम होईल. आता डिसेंबर महिन्याच्या सुऊवातीपासूनच थंडीने जोर धरला होता. ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पहाटेपासून थंडी जाणवू लागली आहे.
यावर्षी अनेक शेतकऱ्यांच्या भातपीक कापणीच्या कामात व्यत्यय निर्माण झाला. दुष्काळी परिस्थिती असली तरी काही ठिकाणी पिके चांगली होती. पावसामुळे त्यांनाही फटका बसला आहे. परिणामी अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.









