ऑनलाईन टीम/तरुण भारत
आयपीएलचा १५ वा हंगाम संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघात मोठे बदल होणार आहेत. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी हा बदल असणार आहे. त्यानंतर भारतीय संघ एक कसोटी, ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. महत्त्वाच्या या तीन दौऱ्यासाठी बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेण्याचे ठरवले आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा या सात खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेतील सर्व सामन्यासाठी या खेळाडूंना विश्रांती दिली जाईल.
आयपीएलचा १५ वा हंगाम संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ ९ ते १९ जून या काळात पाच शहरात पाच टी-२० सामने खेळणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया आयरर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाईल. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वर्कलोड विचारात घेऊन संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली जाणार आहे. भारताच्या काही खेळाडूच्या फॉर्मवरून देखील चिंता व्यक्त केली जात आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपच्या आधी महत्त्वाचे खेळाडू फॉर्ममध्ये नसने काळजीचा विषय आहे.
बीसीसीआय वर्कलोड मॅनेजमेंट प्रोग्राम तयार करत असून आयपीएलमध्ये दिर्घ काळापासून बायो-बबलमध्ये राहिल्याने खेळाडूंना ताजे होण्यासाठी विश्रांती दिली जाणार आहे. किती कालावधीसाठी विश्रांती असेल याचा निर्णय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल. टीम इंडिया आणि बीसीसीआय आगामी टी-२० वर्ल्डकपची तयारी करत आहे. त्यामुळेच खेळाडूंना मानसिक आणि शारिरिक दृष्टीने फिट ठेवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. भारताने मोठ्या कालावधीपासून ICCच्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले नाही, यासाठी द्रविड रणनिती तयार करत आहेत.









