भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत योजनेचे उद्घाटन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लवकरच दिल्लीत लागू होणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत मंगळवार, 18 मार्च रोजी दिल्ली सरकार आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) यांच्यात एक सामंजस्य करार (एमओयू) झाल्यानंतर या योजनेचे उद्घाटन होणार आहे. या योजनेचा अवलंब करणारे दिल्ली हे 35 वे राज्य/केंद्रशासित प्रदेश ठरेल. या दरम्यान, दिल्लीतील जनतेला पहिल्यांदाच आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी कार्ड दिले जाईल.
ही योजना लागू झाल्यानंतर दिल्लीतील आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा मिळेल. याशिवाय, दिल्ली सरकार 5 लाख रुपयांपर्यंतची अतिरिक्त मदत देखील देईल. साहजिकच गरजूंना एकूण 10 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य कव्हर मिळेल, अशी माहिती देण्यात आली. ही योजना दिल्लीत लागू झाल्यानंतर पश्चिम बंगाल हे एकमेव राज्य असेल ज्याने ही योजना स्वीकारली नाही.
सामंजस्य कराराची वेळ निश्चित करण्यात आली असली तरी दिल्लीतील किती कुटुंबांना या योजनेचा भाग बनवायचे आहे? यासंबंधी राज्य सरकारकडून अद्याप परिपूर्ण माहिती मिळालेली नाही. तरीही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात सहा लाख लोकांना लाभार्थी बनवले जाईल. याशिवाय, दिल्लीतील अंगणवाडी सेविका आणि 70 किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांनाही या योजनेचा लाभ मिळेल. आयुष्मान भारतचा भाग होण्यासाठी, दिल्लीतील लोकांना राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाद्वारे चालवल्या जाणाऱ्या ऑनलाइन पोर्टल किंवा मोबाईल अॅपवर नोंदणी करावी लागेल.
देशभरात 55 कोटी लाभार्थी
आयुष्मान भारत योजना देशातील 12.37 कोटी कुटुंबांमधील सुमारे 55 कोटी लोकांना मोफत उपचार सुविधा पुरवत आहे. 29 ऑक्टोबर 2024 रोजी सरकारने आपले नियम बदलत 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक 10 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य कवच देण्याचा निर्णय घेतला.









