वार्ताहर /उचगाव
संपूर्ण जगभरात सिगारेट, मद्य, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हे जणू आता शरीराच्या सवयीचा भाग झाला आहे. कोणी तणावमुक्त जगण्यासाठी तर कोणाच्या जीवनात वाईट प्रसंग घडल्यावर, कोणी अनुभव घेण्यासाठी पहिल्यांदा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतो आणि त्याची चटक लागली की त्या व्यसनाच्या आहारी जातो. खास करून तंबाखू सेवन, सिगारेट आणि गुटखा खाल्याने कर्करोगासारख्या गंभीर आजाराला तोंड द्यावे लागते, असे प्रतिपादन मळेकरणी हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक एन. ओ. चौगुले यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, या गोष्टींचा विचार करून जागतिक आरोग्य संघटनेने 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून सगळीकडे जनजागृती करून पाळला जातो. त्यानुसार जायंट्स ग्रूप ऑफ बेळगाव मेनने तंबाखू विरोधी जनजागृती रॅलीचे आयोजन केले आहे. त्यांचा हा उपक्रम जनतेच्या हितार्थ आहे. याचे सर्वांनी अनुकरण करून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा आणि जीवनमान आनंदमय बनवावे. उचगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उचगाव ग्रामपंचायतचे विद्यमान अध्यक्ष जावेद जमादार, सदस्य बाळकृष्ण तेरसे, माजी सदस्य भास्कर कदम पाटील, अनंत देसाई याचबरोबर जायंट्स ग्रुप ऑफ मेनचे पदाधिकारी उपस्थित होते.
अतिवाड-बेकिनकेरे गावात जनजागृती
अतिवाड आणि बेकीनकेरे या गावातही जनजागृती करण्यात आली. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यास कोणकोणते दुष्परिणाम होतात याबद्दल माहिती देऊन त्याचे सेवन करू नये, असे आवाहन करण्यात आले. यावेळी हातात फलक घेऊन दुचाकीवरून रॅलीसुद्धा काढण्यात आली. यावेळी छोड दो छोड दो गुटखा खाना छोड दो, सिगारेट सेवन करू नका जीवनाला मुकू नका. तंबाखू हटाओ जीवन बचाओ आणि तंबाखू से नाता तोड़ो, जीवन से नाता जोडो? अशा घोषणांनी संपूर्ण गाव दणाणून सोडण्यात आले. शेवटी उचगाव येथील मळेकरणी हायस्कूलमध्ये सांगता करण्यात आली. यावेळी अध्यक्ष सुनिल मुतगेकर, सचिव लक्ष्मण शिंदे यांनी विचार मांडले. पुंडलिक पावशे यांनी सूत्रसंचालन तर अविनाश पाटील यांनी आभार मानले. या रॅलीमध्ये अध्यक्ष सुनिल मुतगेकर, उपाध्यक्ष अविनाश पाटील, अरुण काळे, सचिव लक्ष्मण शिंदे, खजिनदार विजय बनसुर, अशोक हलगेकर, संजय पाटील, मुकुंद महागावकर, राहुल बेलवलकर, सुनिल चौगुले, मधू बेळगावकर, अजित कोकणे, बाळकृष्ण तेरसे, प्रकाश तांजी, यल्लाप्पा पाटील, भास्कर कदम, भरत गावडे, आनंद कुलकर्णी, पुंडलिक पावशे, महेश रेडेकर, पद्मप्रसाद हुली व इतर सदस्यांनी सहभाग घेतला होता.









