अगोदरच आर्थिक खाईत सापडलेल्या पाकिस्तानमध्ये सध्या जे आंदोलन चालू आहे, पाकिस्तान नागरिक आणि लष्कर यांच्यामध्ये जी धुमश्चक्री चालू आहे, ते पाहता पाकिस्तानदेखील बांगलादेशच्या मार्गावर तर जात नाही ना, असा प्रश्न आल्याशिवाय राहत नाही. गेले तीन दिवस पाकिस्तान पेटतोय. अलीकडे झालेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही आणि त्यामुळे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी अनेक पक्ष एकत्रित आले आणि पाकिस्तानात सत्ता ताब्यात घेतलेली आहे. इम्रान खान यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या इम्रान खान कोठडीची हवा खात आहेत. निवडणुकीच्या काळामध्येदेखील त्यांना कोठडीतून बाहेर पडणे शक्य झाले नव्हते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या एकंदरीत वर्तनावर तीव्र संताप व्यक्त करून त्यांना कोठडीची सजा ठोठावली होती. इम्रान खान यांच्या sंपाकिस्तान तेहरीक ए इन्साफ (पीटीआय)च्या समर्थकांनी रविवारी पाकिस्तानातील सुमारे 60 विविध भागांमध्ये प्रचंड हिंसाचार केला आणि राजधानी इस्लामाबादच्या दिशेने हजारो नागरिकांनी आपला मोर्चा वळविला. पाकिस्तानमध्ये सध्या फार मोठ्या अडचणी या आंदोलकांनी निर्माण केल्या. आंदोलनाला तोंड देण्यासाठी अनेक ठिकाणी पाकिस्तान सरकारने अगोदर पोलिसांना पाचारण केले परंतु पोलिसांना देखील आंदोलकांनी फारशी किंमत दिली नाही. असंख्य रस्ते अडवून धरले, वाहतूक यंत्रणा पूर्णत: विस्कटून गेली आणि हजारो नागरिक इस्लामाबादच्या दिशेने पुढे सरकले. पाकिस्तान सरकारने आंदोलकांना अडविण्यासाठी निर्माण केलेले अनेक अडथळे तोडून आंदोलकांनी इस्लामाबादमध्ये प्रवेश केला. सध्या पाकिस्तानमध्ये आंदोलक फारच संतप्त. इम्रान खान यांची मुक्तता करण्यासाठीच हे आंदोलन चालू आहे मात्र अगोदरच आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या पाकिस्तानला आणखी एका नव्या आर्थिक संकटाला सध्या तोंड द्यावे लागत आहे. इस्लामाबादमधील डी-चौक हे एक महत्त्वाचे ठिकाण असून त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा इरादा आहे. खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गुंडापूर आणि इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांनी हजारो नागरिकांना आपल्याबरोबर घेऊन तीव्र आंदोलन सुरू केले आहे. पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी आंदोलकांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देऊनदेखील हे आंदोलन थांबण्याचे नाव घेत नाही. पाकिस्तानमध्ये अराजकता ही पाचवीलाच पुजलेली आहे. आतापर्यंतचा पाकिस्तानचा इतिहास पाहता, हे राष्ट्र ज्या पद्धतीने निर्माण झाले, त्यानंतरपासून आतापर्यंत या राष्ट्रांमध्ये कधीही शांतता पाहावयास मिळालेली नाही. सध्या प्रचंड आर्थिक संकटांना तोंड देणाऱ्या पाकिस्तानला अगोदरच भारताविऊद्ध आग ओकत असल्याबद्दल मित्रत्वाच्या नात्याने चीन पाकिस्तानला जी मदत करीत होता, ते चीन राष्ट्र हळूहळू पाकिस्तानचा बराचसा भाग गिळंकृत करून पाहत आहे. त्यामुळेच पाकिस्तानातील नागरिकांमध्ये चीनच्या विरोधातही तीव्र संताप आहे. पाकिस्तानचा पश्चिमेकडील देश म्हणजेच अफगाणिस्तान. त्या देशाच्या विरोधात पाकिस्तानमध्ये जे काही वातावरण आहे, ते पाहता हा देश आणि अफगाणिस्तान हे पूर्णत: एकमेकांचे कट्टर शत्रू ठरले आहेत. त्यातच आता चीनने पाकिस्तानला संकटकाळी जी काही मदत केली, त्या बदल्यात चीनने पाकिस्तानच्या महत्त्वाच्या अनेक ठिकाणी स्वत:चा फायदा कसा मिळविता येईल, या अनुषंगाने आपला व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे भारताशी पंगा घेऊन भारताला संपविण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्तानला सध्या असंख्य संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच देशांतर्गत जे काही राजकीय मतभेद आहेत, त्यांची तीव्रता वाढत आहे. म्हणजेच सध्या इम्रान खानच्या समर्थनार्थ जे आंदोलन चालू आहे, ते खरेतर पाकिस्तान सरकार उलथवून लावण्यासाठीच आहे. आतापर्यंत गेल्या तीन दिवसांतील या आंदोलनात असंख्य नागरिक मरण पावले आहेत. त्यातच आत्मघाती हल्ल्यामधून पाकिस्तानचे सहा पोलीस हे सोमवारी मध्यरात्री मारले गेले. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान, हे रावळपिंडी येथील आदियाला तुऊंगात बंदिस्त आहे. गेल्यावर्षी इस्लामाबाद येथील एका न्यायालयाने पोशाखाना प्रकरणात त्यांना दोषी ठरविले आणि त्यांना त्यांच्या घरातून अटक करून तुऊंगात पाठविले. आतापर्यंत त्यांच्यावर जे दोनशे गुन्हे दाखल झालेले आहेत ते पाहता, इम्रान खान यांची तुऊंगातून सुटका होणे कठीण आहे आणि जोपर्यंत इम्रान खान यांची सुटका होत नाही, तोपर्यंत इम्रान खान यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून हिंसाचार चालू ठेवतील. या हिंसाचारामुळे आतापर्यंत पाकिस्तानात हजारो कोटी ऊपयांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. पेट्रोलसह अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या दरात पाकिस्तानमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. अर्थव्यवस्था पूर्णत: कोलमडलेली आहे. त्यातच अशातऱ्हेच्या आंदोलनामुळे पाकिस्तानला ‘दुष्काळात तेरावा’ अशा स्थितीचा सामना करावा लागत आहे. भारताच्या शेजारी असलेल्या या देशाला नेहमीच एकेका नव्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. सध्या आंदोलनाचे एक संकट देशावर चाल करून पुढे जात आहे. त्यातून पाकिस्तानमध्ये आगडोंब उसळतोय की काय, अशी अवस्था आहे. एकंदरीत पाकिस्तान पुन्हा एकदा राजकीय अस्थिरतेच्या दिशेने वाटचाल करीत राहील. पाकिस्तानात सध्या कलम 245 लागू करण्यात आलेले आहे आणि त्यातूनच ‘दिसेल त्याला गोळी घाला’चा आदेशही लष्कराला देण्यात आलेला आहे. यातून पाकिस्तानमध्ये अंतर्गत संघर्ष हे वाढत जातील आणि पुन्हा एकदा या देशात अराजकता वाढत जाणार आहे. हा देश सर्वांशीच संघर्ष करू पाहतोय परंतु सध्यातरी या देशाला अंतर्गत संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. अन्य कोणत्याही संकटाला तोंड देता येते परंतु आर्थिक संकट हे एवढे गंभीर बनलेले आहे की, त्यातून मार्ग काढणे कठीण. त्यातच आंदोलनाने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडेच मोडून टाकलेले आहे. पाकिस्तानमधील अंतर्गत संघर्ष हे आता अटळ बनलेले आहेत. पाकिस्तानच्या सरकारने आंदोलकांना जो गंभीर इशारा दिलेला आहे, तो पाहता आंदोलकांवर बेछूट गोळीबार करण्यास देखील सरकार मागे-पुढे पाहणार नाही. रक्तपाताने प्रश्न सुटत नसतात. ते शांततेनेच सुटू शकतात, यावर पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा विश्वास नसावा. पाकिस्तान आपल्याच कर्माची फळे सध्या भोगत आहे.
Previous Articleइलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे विश्वासार्ह
Next Article डायनासोरच्या नव्या प्रजातीचा शोध
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








