कोल्हापूर / संतोष पाटील :
पुणे, बेंगलोर, हैदराबादच्या धर्तीवर कृषी, सहकार, ऐतिहासिक आणि धार्मिक केंद्र असलेल्या कोल्हापुरातील आयटी पार्क यशस्वी होण्यास काही अडचण नाही. कुशल, अकुशल मनुष्यबळाची मोठी संख्या ही कोल्हापूरची जमेची बाजू असली तरी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, पायाभूत सुविधांची वानवा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेंडा पार्कातील 34 हेक्टर कृषी विभागाची जमीन देण्याच्या सुचना केल्यापासून कोल्हापुरात ऐटीत आयटीपार्क होईलही, पण तत्पूर्वी त्रुटींचा अभ्यास करुन त्याची पूर्तता कितपत होते, यावरच पार्कचे भवितव्य अवलंबून आहे.
सद्यस्थितीत कोल्हापूरला आयटी पार्क यशस्वी होण्यासाठी पायाभूत सुविधा हे एक मोठं आव्हान आहे. पायाभूत सुविधांसह हाय–स्पीड इंटरनेटसोबत सुरक्षित नेटवर्क ही आयटी पार्कची ‘लाईफलाईन’ आहे. आयटी कंपन्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्लायंट्ससोबत रिअल–टाईममध्ये काम करतात. यासाठी फाईव्ह जी, फायबर ऑप्टिक्स किंवा सॅटेलाईट इंटरनेटसारख्या प्रगत तंत्रज्ञानाची निर्मिती कोल्हापुरात करावी लागेल. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा अॅनालिसिस, क्लाऊड कम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता हे सर्व इंटरनेटवर अवलंबून असतात. बेंगळुरूमधील आयटी हब यशस्वी होण्यामागे तिथली उत्कृष्ट इंटरनेट सुविधा मैलाचा दगड ठरली. तिथे अनेक टेलिकॉम कंपन्या आणि डेटा सेंटर्स आहेत, ज्यामुळे कंपन्यांना अखंडित सेवा मिळते.
इंटरनेट सुविधा कमकुवत असणारी शहरे आयटी क्षेत्रात मागे पडतात. नुसती जमीन देऊन आयटी पार्क होणार नाही. त्यासाठी असणाऱ्या इतर जोडण्याही ताकदीने कराव्या लागतील. सुरूवातीपासून योग्य नियोजन आणि गुंतवणुक झाली तरच आयटी पार्क यशस्वी होईल, अन्यथा पंचगंगा प्रदूषण, फाईव्ह स्टार एमआयडीसी, कोकण रेल्वे, गोवा कोकण रेल्वे, उड्डाण पुले आदींसारखे आटी पार्कही कागदावरचे स्वप्न ठरण्याची भीती आहे. आयटीसाठी फक्त जागा देऊन राजकीय फुशारक्या न मिरवता त्यासाठी संलग्नित सुविधांची जोडणीही करावी लागणार आहे.
- मोठ्या ब्रॅण्डशिवाय शक्य आहे?
प्रतितयश कंपन्यांचे ब्रँड मूल्यामुळे इतर छोट्या कंपन्या आणि गुंतवणूकदार त्या शहरात आकर्षित होतात. या कंपन्या उच्च दर्जाच्या सुविधांच्या मागणीमुळे परिसराचा विकासही वेगाने होतो. या कंपन्या स्थानिक अर्थव्यवस्थेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडतात. सुरुवातीच्या काळात हैदराबादमध्येही फक्त मध्यम आकाराच्या कंपन्या होत्या. नंतर मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्या आल्या. तसे कोल्हापुरातही शक्य आहे.
1 स्थानिक गरजांवर आधारित आयटी सेवा : कोल्हापूर हे शेती, सहकार आणि लघु उद्योगांचे केंद्र आहे. या क्षेत्रांसाठी सॉफ्टवेअर सोल्युशन्स (उदा. अॅग्री–टेक, सप्लाय चेन मॅनेजमेंट) विकसित करणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन दिल्यास स्थानिक मागणी पूर्ण होईल आणि पार्कला आधार मिळेल.
2 छोट्या कंपन्यांना आकर्षित करणे : मोठ्या कंपन्यांपेक्षा छोट्या आयटी फर्म्सना कमी खर्चात आणि मर्यादित सुविधांमध्येही काम करता येते. कोल्हापुरात जमीन आणि ऑपरेशनल खर्च कमी असल्याने या कंपन्यांसाठी हे आकर्षक ठरू शकते. सरकारी प्रोत्साहन (कर सवलती, सबसिडी) दिल्यास अशा कंपन्या येऊ शकतात.
3 कुशल मनुष्यबळाचा वापर : कोल्हापूरमध्ये अभियांत्रिकी आणि आयटी शिक्षण घेणारे अनेक तरुण आहेत. त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार दिल्यास बाहेरून मोठ्या कंपन्यांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होईल. प्रशिक्षण केंद्रे आणि इनक्युबेशन सेंटर्स उभारून स्टार्टअप्सना प्रोत्साहन देता येईल.
4 आऊटसोर्सिंग हब म्हणून विकास : पुणे, मुंबई, बेंगळुरूसारख्या शहरांतील मोठ्या आयटी कंपन्या त्यांचे काही प्रोजेक्ट्स येथील खर्च कमी असल्याने याठिकाणी आऊटसोर्स करू शकतात.








