पुणे / प्रतिनिधी :
सुरेल सनईवादन…बँड पथकाचे सुमधुर वादन…ढोल ताशांचा गजर अन् रांगोळ्यांचा पायघड्या…अशा भारावलेल्या वातावरणात मानाच्या पाच गणपतींना शुक्रवारी निरोप देण्यात आला.
कोरोनानंतरच्या निर्बंधमुक्त वातावरणात दोन वर्षांनी विसर्जन मिरवणूक पार पडली. मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपतीची प्रशासनाकडून आरती करून सकाळी 10.30 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार गिरीश बापट, विधान परिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, सचिन आहिर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.
दोन वर्षांच्या कालावधीनंतर निर्बंधमुक्त उत्सव साजरा होत असल्याने गणेशभक्तांच्या आनंदाला उधाण आल्याचे चित्र विसर्जन मिरवणुकीत दिसून आले. सकाळी साडेदहा वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. चांदीच्या पालखीमध्ये कसबा गणपती विराजमान होता. सव्वा अकराच्या सुमारास कसबा गणपतीचे बेलबाग चौकात आगमन झाले. कसबा गणपतीच्या पुढे प्रभात बँडने देशभक्तीपर गाणी वाजवून वातावरण प्रफुल्लित केले. त्यानंतर कलावंत पथकातील कलाकारांचे वादन पाहून गणेशभक्त भारावले. यानंतर रमणबाग, रुद्रगर्जना ढोल-ताशा पथकांच्या वादनाने दोन वर्षांनंतर लक्ष्मी रस्ता दुमदुमला. या ढोलपथकांच्या वादनाने गणेशभक्तांनाही थिरकायला लावले. दुपारी सव्वातीनच्या सुमारास गणरायाचे अलका चौकात आगमन झाले. त्यानंतर 4.18 मिनिटांनी गणपतीचे घाटावर विसर्जन झाले.
कसबा गणपती पाठोपाठ मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मार्गस्थ झाला. श्रींची विलोभनीय मूर्ती चांदीच्या पालखीत विराजमान झाली होती. मिरवणुकीच्या अग्रभागी सतीश आढाव यांच्या नगारावादनानाने वातावरणात भक्तीरस निर्माण केला. यानंतर न्यू गंधर्व बँड पथकाने गणेशभक्तांची मने जिंकली. यानंतर समर्थ प्रतिष्ठान, शिवमुद्रा या ढोल-ताशा पथकातील वादनाने श्रोते तल्लीन झाले. यानंतर विष्णूनाथ हे शंख वादनाचे पथक मिरवणुकीचे आकर्षण ठरले. तसेच महिलांचे लेझीम पथकही लक्षवेधक ठरले. पारंपरिक पेहरावातील अश्वारूढ कार्यकर्ते मिरवणुकीमध्ये सहभागी होते. सायंकाळी 4.45 वाजता हा गणपती अलका चौकात आला. सव्वा पाचच्या सुमारास या गणपतीचे विसर्जन झाले.
तांबडी जोगेश्वरी गणपती पाठोपाठ मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मार्गस्थ झाला. गुरुजी तालीम मंडळाची मिरवणूक भक्तिरथातून काढण्यात आली. या रथात फुलांच्या सजावटीसह विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या प्रतिकृतीने सर्वांचे लक्ष वेधले. मिरवणुकीच्या अग्रभागी जयंत नगरकर यांच्या नगारावादनाचा गाडा होता. गर्जना आणि नादब्रम्ह ढोल-ताशा वादनाने वातावरणात चैतन्य निर्माण झाले. मिरवणुकीत गुलालाची मुक्तहस्ते उधळण करण्यात आली. मंडळाचे कार्यकर्ते गुलालामध्ये न्हाऊन निघाले होते. सव्वासहाच्या सुमारास गणपती अलका चौकात दाखल झाला. सातच्या सुमारास या गणपतीचे विसर्जन झाले.
यापाठोपाठ फुलांच्या आकर्षक सजावटीने साकारलेल्या श्री गजमुख रथात मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती लक्ष्मी रस्त्यावर दाखल झाला. लोणकर बंधूंची सनई आणि बिडवे बंधूंच्या नगारा वादनाने गणेशभक्त भारावून गेले. स्वरूपवर्धिनी, गजलक्ष्मी आणि गजर या ढोल-ताशा पथकांच्या वादनाने आसमंत दुमदुमला. साडेसातच्या सुमारास गणपती अलका चौकात दाखल झाला. साडेआठच्या सुमारास या गणपतीचे विसर्जन झाले.
यानंतर फुलांनी सजवलेल्या मेघडंबरी रथातून मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा मिरवणुकीत सहभागी झाला. बिडवे बंधू यांचे नगारावादन मिरवणुकीच्या मध्यभागी होते. श्रीराम शिवमुद्रा, वज्र या ढोल-ताशा पथकांनी वाजवलेल्या तालावर गणेशभक्तांनीही ठेका धरला. साडेआठच्या सुमारास गणपती अलका चौकात दाखल झाला. नऊच्या सुमारास या गणपतीचे विसर्जन झाले.
मानाच्या गणपतींसाठी गणेशभक्तांचा महापूर
कोरोनामुळे दोन वर्षे मिरवणूक झाली नाही. तसेच मानाचे गणपती लक्ष्मी रस्त्यावरून जाणार असल्याने लाखो पुणेकरांचा टिळक चौकात जनसागर लोटला होता. परदेशी नागरिकांचा मिरवणुकीतीस सहभागही लक्षणीय होता.
रांगोळ्यांच्या पायघडय़ा
सकाळी साडेदहा वाजता राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला मंडई येथून प्रारंभ झाला. प्रत्येक चौकात कला अकादमीकडून मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.








