रणजी संघाची घोषणा : रोहित शर्मा 10 वर्षानंतर खेळणार
वृत्तसंस्था/ मुंबई
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खराब कामगिरीनंतर रोहित शर्मा रणजी स्पर्धेत खेळणार आहे. मुंबई क्रिकेट संघटनेने जम्मू-काश्मीर विरुद्ध होणाऱ्या लढतीसाठी 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. राष्ट्रीय संघातून खेळणाऱ्या रोहित शर्मा, युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर यांना मुंबई संघात स्थान मिळाले आहे. अर्थात, संघाच्या नेतृत्वाची धुरा मात्र अजिंक्य रहाणेकडे असणार आहे. दि. 23 जानेवारीपासून उभय संघातील सामना बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे खेळवण्यात येईल.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या खराब फॉर्मशी झुंजत असून ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही त्याची बॅट शांत होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पाच डावात केवळ रोहित केवळ 31 धावा करू शकला. यानंतर रोहित शर्मा मुंबईला आल्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये मुंबईच्या रणजी क्रिकेट संघासह सराव करताना दिसला. तेव्हापासूनच रोहित रणजी खेळणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेरीस रोहित शर्माने रणजी ट्रॉफी खेळणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आता त्याचा आगामी मुंबई वि जम्मू काश्मीर सामन्यासाठी संघात समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, 2013 मध्ये रोहित उत्तर प्रदेशविरूद्ध अखेरचा सामना खेळला होता.
मुंबईच्या कर्णधारपदाची जबाबदारी अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आली आहे. हार्दिक तोमोर आणि आकाश आनंद यांचा यष्टीरक्षक म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आयपीएलमध्ये अनसोल्ड राहिलेल्या शार्दुल ठाकूरला संधी मिळाली आहे. रणजी ट्रॉफीत चांगली कामगिरी करून पुन्हा एकदा टीम इंडियात आपली स्थान मिळवण्याचे त्याचं लक्ष्य असेल. तर रोहित शर्माशिवाय यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, शिवम दुबे यांनाही संघात संधी देण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरविरुद्ध सामन्यासाठी मुंबईचा संघ –
अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, शिवम दुबे, हार्दिक तोमोर (यष्टीरक्षक), आकाश आनंद (यष्टीरक्षक), तनुष कोटियन, शम्स मुलानी, हिमांशू सिंग, शार्दुल ठापूर, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूजा, रॉयस्टन डायस, कर्ष कोठारी.









