रत्नागिरी :
जिल्हा परिषदेने विशेष शिक्षकांना न्याय देण्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जिह्यातील 42 विशेष शिक्षकांचे केंद्रस्तरावर समायोजन करण्यात आले आहे. असा निर्णय घेणारी रत्नागिरी ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे.
हा महत्त्वाचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार तसेच जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे आणि शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या प्रयत्नामुळे शक्य झाला आहे. हे समायोजन 15 जुलै 2025 रोजी पूर्ण झाले आणि 22 सप्टेंबर 2025 रोजी विशेष शिक्षकांना यासंदर्भातील आदेश व आयडी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या शिक्षकांनी आपला अनुभव आणि कौशल्याचा वापर करून शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन लोहार यांनी केले.
या निर्णयामुळे गेल्या 17 वर्षांपासून कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. त्यांनी पालकमंत्री सामंत यांचे आभार मानले. या शिक्षकांचे वेतन लवकरच अदा केले जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या समायोजनामुळे विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार व सुयोग्य शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
- तालुकानिहाय समायोजित शिक्षकांची संख्या:
मंडणगड – 2
दापोली – 5
खेड – 5
चिपळूण – 7
गुहागर – 3
संगमेश्वर – 5
रत्नागिरी – 7
लांजा – 4
राजापूर – 4








