कोल्हापूर / सौरभ मुजुमदार :
जगातील अतिसंवेदनशील म्हणून ओळखला जाणारा ,जैवविविधतेचे आगर असणारा, हजारो वन्यजीवांच्या अस्तित्वाने समृद्ध असा घनदाट जंगल परिसर म्हणजेच दाजीपूर गवा अभयारण्य होय. राजर्षी शाहू महाराजांनी सर्वप्रथम संरक्षित केलेला हा संपूर्ण परिसर कालांतराने महाराष्ट्रातील सर्वात जुने व पहिले अभयारण्य म्हणून नावारूपास आला. कोल्हापूर जिह्यातील हजारो हेक्टर शेती व लाखो प्रजेची तहान भागवणाऱ्या राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या ज्या परिसराला पर्जन्यदेवतेचेही वरदान लाभलेले आहे.
पावसाळ्यामध्ये दाजीपूर परिसर स्वर्गमय होऊन जातो. नानाविविध कीटक, पक्षी, कृमी, सरपटणारे प्राणी, जलचरांचेही येथे प्रत्यक्ष दर्शन होते. घाटमाथ्यावरून प्रचंड वेगाने येणाऱ्या असंख्य ढगांच्या रांगा, दाट धुके यात आपण कधी हरवून जातो, लक्षातच येत नाही. परंतु हा पाऊस प्रत्यक्ष जवळून अनुभवण्यासाठी वन्यजीव विभागाने यावर्षी पर्यटकांना संधी उपलब्ध करून दिली आहे. साधारणत: जून ते ऑक्टोबर या काळात अभयारण्य संपूर्ण पर्यटकांसाठी बंद असते. त्यामुळे साहजिकच वन्यजीव विभागाने केलेली निवास व्यवस्थाही बंद असते. यावर्षी मात्र अभयारण्य बंद असले तरी येथील तंबू निवास आणि भोजन व्यवस्था पर्यटकांसाठी सुरू राहणार आहे. नेमकी हीच गोष्ट पर्यटकांना कुटुंबासह दाजीपूरचा हा आगळावेगळा पाऊस प्रत्यक्ष जवळून अनुभवण्याची संधी उपलब्ध करून देणारी आहे.
स्थानिक ग्रामस्थ व शासनांच्या संयुक्त विद्यमाने ठक्याचा वाडा येथे विकास समिती, ओलवण यांच्या उत्कृष्ट व संरक्षित व्यवस्थापनाखाली तंबूमध्ये निवास करण्याचा वेगळाच अनुभवता पर्यटकांना भर पावसात आता घेता येणार आहे. पावसाळ्यात हा निसर्ग वेगळेच रूप धारण करतो. शिवगड येथील विस्तीर्ण पठारावरील वन्यजीवांच्या हालचाली, त्यांच्या विष्टा व पाउलखुणा पाहण्याची संधी घेऊ शकता. झांजूचे पाणी, राधानगरी धरणाचे पाणलोट क्षेत्र, उगवाईदेवी मंदिर, हसणे लघु जलप्रकल्प अशी विविध ठिकाणे व फोंडा घाटातील खिंड ओलांडल्यावर होणारे कोकणचे विलोभनीय दृश्य अशी ठिकाणे पावसामध्येही पाहू शकतो.
वन्यजीव विभागाच्या व्यवस्थापनाखाली न्याहारी आणि भोजन व्यवस्थेचा पाहुणचारही नक्कीच गावाकडची आपुलकी, प्रेम व जिव्हाळा देऊन जातो. डोंगर माथ्यावरून खळाळत येणाऱ्या नैसर्गिक पाण्याला वेगळीच चव आहे. या वेळच्या पावसाळ्यामध्ये दाजीपूरचा पाऊस सहकुटुंब सुरक्षितपणे अनुभवण्याची संधी वाया घालवू नका. येथील तंबू निवास व्यवस्थेच्या नोंदणीसाठी शहरातील कदमवाडीत असणाऱ्या वन्यजीव कार्यालयात संपर्क करून अधिक माहिती घेऊ शकता.
- एकदा तरी दाजीपूरच्या पर्यटनाचा अनुभव घ्यावा.
पावसाळ्यामधील विलोभनीय निसर्ग व पहाटेचे धुके अनुभवण्यासाठी एकदा तरी दाजीपूरच्या पर्यटनाचा अनुभव घ्यावा. दाजीपूरमध्ये यावर्षी पावसाळ्यामध्येही पर्यटकांसाठी तंबू निवास व्यवस्था तसेच भोजन आणि न्याहारीची व्यवस्था अल्प दरात उपलब्ध आहे. सहकुटुंब सुरक्षितपणे दाजीपूरचा पाऊस अनुभवण्यासाठी पर्यटकांनी जरूर यावे.
– आर. डी. घुणकीकर, परीक्षेत्र वनाधिकारी, दाजीपूर








