बेळगाव : भरधाव टेम्पोची मोटारसायकलला धडक बसून मूळचे तुडये, ता. चंदगड व सध्या राहणारा बेटगेरी, ता. खानापूर येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी कल्लेहोळ क्रॉसजवळ हा अपघात घडला आहे. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. रवळू रामलिंग मोहिते (वय 48) रा. बेटगेरी, ता. खानापूर असे त्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. इस्कॉनचे सदस्य चाळोबा मोहिते यांचे ते वडील होत. सोमवारी मळवीवाडी येथे एका लग्न समारंभात भाग घेऊन ते मोटारसायकलवरून बेळगावच्या दिशेने येत होते. त्यावेळी कल्लेहोळला जाणाऱ्या गुड्स टेम्पोची धडक बसून ही घटना घडली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या रवळू यांना इस्पितळात हलविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी 108 रुग्णवाहिकेला पाचारण केले. रुग्णवाहिका पोहोचण्याआधीच याचवेळी या मार्गावरून जाणारा त्यांचा मुलगा अमोल याने अपघातात वडील जखमी झाल्याचे पाहिले. आपला मित्र प्रदीपच्या मदतीने मोटारसायकलवर बसवून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला आणले. अमोल व प्रदीप हे दोघे मोटारसायकलवरून जोतिबा डोंगराकडे निघाले होते. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराचा उपयोग न होता दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस निरीक्षक उमेश एम., साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पी. के. परसन्नावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
Previous Articleउमेदवारांना खर्चाचा तपशील देण्याची सूचना
Next Article गोवंश वाहतूक प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









