पुणे / प्रतिनिधी :
वडिलांसह सावत्र आईकडून दिल्या जाणार्या शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळून एका १७ वर्षीय मुलीने धावत्या रेल्वेतून उडी मारून आत्महत्या केली. अश्विनी चव्हाण (रा. येरवडा) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वडिल नामदेव चव्हाण, सावत्रआई लक्ष्मी चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबधित घटना तीन जूनला घडली आहे. याप्रकरणी दौंड लोहमार्ग पोलीस ठाण्यात सुरवातीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर हा गुन्हा येरवडा पोलीस ठाण्यात पुढील तपसासाठी वर्ग करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण कुटुंबीय अनेक वर्षांपासून येरवडा परिसरात रहायला आहे. नामदेवला पहिल्या पत्नीपासून मुलगी झाली होती. मात्र, त्याने लक्ष्मीसोबत लग्न केले होते. २०१४ पासून दोघेही अश्विनीला शारिरीक व मानसिक त्रास देत होते. दरम्यान, तीन जूनला तिघेही रेल्वेतून प्रवास करीत होते. पालकांच्या त्रासाला कंटाळून अश्विनीने दौंडच्या हद्दीत रेल्वेतून उडी मारुन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील पुढील तपास करीत आहेत.









