गुजरातच्या सागरी सीमेतील घटना- पाकिस्तानची आगळीक
वृत्तसंस्था / पोरबंदर
पाकिस्तानी नौदलाने शनिवारी गुजरातमध्ये पोरबंदच्या सागरी सीमेत 35 भारतीय मच्छिमारांचे अपहरण केले आहे. हे मच्छिमार 6 नौकांमधून जात होते. तत्पूर्वी शुक्रवारी रात्री देखील 40 भारतीय मच्छिमारांचे अपहरण करण्यात आले होते. या घटनांमुळे गुजरातच्या मच्छिमारांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
मच्छिमार आंतरराष्ट्रीय सागरी सीमेनजीक मासेमारी करत असताना पाकचे नौसैनिक मोठय़ा स्टीमरने तेथे पोहोचले आणि बंदुकीच्या धाकावर खलाशांना समर्पण करण्यास भाग पाडले आहे. अरबी समुद्रात पाकिस्तानच्या तटरक्षक दलाचे वर्तन दिवसेंदिवस नियंत्रणाबाहेर जात असल्याचे उद्गार पोरबंदर मच्छिमार बोट असोसिएशनचे माजी प्रमुख मनीष लोढारी यांनी काढले आहेत.
नौकांचे अपहरण करत त्यांना कराचीच्या दिशेने नेण्यात आल्याचे समजते. पोरबंदर, वेरावल आणि ओखा येथील हे मच्छिमार आहेत. पाकिस्तानी मरीनने मागील एक महिन्यात पाचव्यांदा आणि आठवडय़ात तिसऱयांदा अपहरणाची घटना घडवून आणली आहे.
या 5 घटनांमध्ये 145 मच्छिमारांचे अपहरण करण्यात आले आहे. यातील 15 नौका पोरबंदर, ओखा आणि वेरावल येथील आहेत. पाकिस्तानची अशाप्रकारची आगळीक रोखण्यासाठी सरकारने दबाव आणावा तसेच मच्छिमार आणि नौका सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे.









