आमदार चंद्रकांत जाधव यांचा उद्धिग्न सवाल महापालिकेच्या आरोग्य, घनकचरा विभागातील अधिकाऱयांना धरले धारेवर
प्रतिनिधी / कोल्हापूर
शहरात आजही तुंबलेली गटर्स आणि कचऱयाचे ढीग असे जे चित्र दिसते ते गंभीर आहे. या प्रश्नांसाठी नगरसेवकांना महापालिकेत यावे लागते, ही बाब भूषणावह नाही. यावरून महापालिकेचा आरोग्य आणि घनकचरा विभाग किती सक्षमपणे आणि गंभीरपणे काम करतो हे सिद्ध होते. आणखी किती दिवस तुंबलेली गटर्स आणि साचलेले कचऱयाचे ढीग यावर आपण चर्चा करणार आहोत?, असा उव्दिग्न सवाल आमदार चंद्रकांत जाधव यांनी केला.
आमदार जाधव यांनी महापालिकेत आरोग्य घनकचरा विभागाची आढावा बैठक घेतली. या प्रसंगी ते बोलत होते. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे प्रमुख उपस्थित होते. समृध्द कोल्हापूरच्या निर्माणसाठी महापालिकेचा आरोग्य घनकचरा विभाग सक्षम पाहिजे. या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी काम नव्हे तर कर्तव्य म्हणून जबाबदारी स्विकारली व कामाचे सूक्ष्म नियोजन केल्यास आपले कोल्हापूर कायमस्वरूपी `स्वच्छ व सुंदर’ राहिल, असा विश्वास आमदार जाधव यांनी व्यक्त केला.
बदली कामगार पाठविणाऱ्यांवर कारवाई करा
प्रभागनिहाय स्वच्छतेबाबतची माहिती घेत आमदार जाधव यांनी आरोग्य निरीक्षक व मुकादम यांच्याशी संवाद साधला. शहर स्वच्छतेमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका सफाई कर्मचारी, मुकादम व आरोग्य निरीक्षकांची आहे. अनेक सफाई कर्मचारी वयोवृध्द झालेत, त्यांना काम जमत नाहीत. त्यांच्या ठिकाणी त्यांच्या घरातील व्यक्तींना संधी द्या. जे कर्मचारी जबाबदारीने काम करत नाहीत त्यांना समज द्या. जे कर्मचारी बदली कामगार कामावर पाठवतात, त्यांच्यावर कारवाई करा अशा सूचना आमदार जाधव यांनी दिल्या.
किटकनाशक फवारणीनंतर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घ्या
शहर स्वच्छ राहण्यासाठी कोंडाळामुक्त प्रभाग ही संकल्पना राबविण्यात येत आहे. ज्याठिकाणचे कंटेनर हटविण्यात आले आहेत अशा ठिकाणी कचरा न टाकणेबाबतचा सुचना फलक लावावेत, नागरीकांमध्ये जनजागृती करावी व प्रभागातील कचरा संकलनाचे काम 100 टक्के यशस्वतीरित्या पार पाडल्यास कच्रयाची समस्या राहणार नाही. किटकनाशक फवारणीचे नियोजन करून, दिवस व वेळ निश्चित करावा आणि फवारणी झाल्यानंतर त्या भागातील नागरिकांच्या सहया कर्मचाऱयांनी घ्याव्यात, त्यामुळे नागरिकांची तक्रार राहणार नाही असे मत आमदार जाधव यांनी व्यक्त केले.
ड्रेनेज मशिनसाठी प्रस्ताव द्या
ड्रेनेज तुंबुन पाणी रस्त्यावर आल्याची तक्रार आल्यानंतर, सफाई कर्मचारी तेथे जातो. या पुढे असे झाले नाही पाहिजे असे सांगत आमदार जाधव म्हणाले, वारंवार चोकअप होणाऱया ड्रेनेजची पाहणी करुन, ते चोकअप होण्यापूर्वी जेट मशिनने स्वच्छ करून घ्यावे. ड्रेनेज स्वच्छतेसाठी मशिनरीची आवश्यकता असल्यास, त्याचा प्रस्ताव द्या. शासनाकडून निधी आणू. तसेच महापालीकेच्या सर्व वाहनांचे ऑडीट करून घ्यावे. कत्तलखाना विभागाने लोकांना विश्वासात घेऊन काम करावे, या विभागातून उत्पन्न वाढले पाहिजे अशी अपेक्षा आमदार जाधव यांनी व्यक्त केली.
पंचगंगा स्मशानभूमी नूतनीकरणाचा प्रस्ताव द्या
संपूर्ण देशात स्मशानभूमी विभागाचे काम उत्कृष्ट आहे. पंचगंगा स्मशान भूमी नुतनीकरणाचा व जनावरांच्या दहन वाहिकेचा प्रस्ताव द्यावा अशी मागणी आमदार जाधव यांनी केली. योग्य नियोजन व व्यवस्थापनातून मार्केटमध्ये कचऱयाची ढिग साचणार नाहीत, याची दक्षता घनकचरा विभागाने घ्यावी तसेच व्यावसायिकांनाही कचरा टाकण्याबाबत आचारसंहिता घालून द्यावी अशी सूचना आमदार जाधव यांनी केली. परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली असून, निर्बंजीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवावी. तसेच प्लॅस्टिक बंदीचा नागरिकाबरोबर प्रशासनाला विसर पडला आहे का ? असा सवाल आमदार जाधव यांनी उपस्थित केला.
कोल्हापूरचे एक थेंबही सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळायला नको, त्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करून, पाणी शेत, बागला देण्याबाबतचा प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करा. हा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून आणण्याचे आश्वासन आमदार जाधव यांनी दिले. यावेळी सहाय्यक आयुक्त संदीप घारगे, आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक पोळ, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील,आरोग्य निरीक्षक व मुकादम उपस्थित होते.









