प्रतिनिधी/ रत्नागिरी
मागील 15 वर्षात आंबा शेतीची प्रगती झालेली नाही. नैसर्गिक व आर्थिक संकटात येथील आंबा बागायतदार जणू होरपळून निघत आहे. सध्या आंबा शेती करणे फारच खर्चिक झाले आहे. बागायतदार शेतकऱयांचे पायाभूत प्रश्नच सुटलेले नसल्याने सर्व बागायतदारांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
येथील हापूस आंबा प्रश्नी शनिवारी टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये आंबा बागायतदारांच्या वार्षिक सभा पार पडली. सभेला संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत, ज्येष्ठ बागायतदार तुकाराम घवाळी, बावा साळवी, सतीश शेवडे, काका मुळय़े आदी मान्यवर उपस्थित होते. आंबा शेतकऱयांच्या विविध प्रश्न मांडताना पॅनिंगला पाठवण्यात येणाऱया तीन नंबर आंब्याचा दर अवघा 10 ते 12 रुपये एवढाच मिळतो. फवारणीच्या पंपासाठी रॉकेल मिळत नसल्याने 90 रुपये लिटर दर असलेले पेट्रोल वापरावे लागत असल्याची खंत बागायतदार काका मुळये यांनी व्यक्त केली.
कोकणात वानरांच्या उपद्रवाने शेतकऱयांनी शेती करणे सोडले. यामुळे हे वानर आंबा, काजू पिकांकडे वळले असून आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले. औषध कंपन्या व औषध विक्री दुकानांवर सरकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे किंमती भरमसाठ वाढवण्यात आल्या आहेत. 1 हजार, 2 हजार, 3 हजार रुपये लिटर किंमत असलेली औषधे फवारूनही त्याचा परिणाम होत नाही. मुळात या औषधामधील कंटेन्ट तपासणी करणारी यंत्रणाच प्रभावशाली नाही. यापूर्वी जी औषधे उपयुक्त ठरली होती, त्या औषधांवर सध्या बॅन लावण्यात आले असल्याचे ज्येष्ठ बागायतदार काका मुळ्ये यांनी सांगितले.
आंबा पिकांसाठी एखादे औषध तयार करण्यात आलेले नाही. त्यामुळे कृषी विद्यापीठांनी यावर संशोधन करण्याची गरज असल्याचे बागायतदार मंगेश साळवी यांनी सांगितले. बँकाच्या अखत्यारित कर्जमाफी विषय आहे. मात्र यादी उपलब्ध नसल्याचे सांगून गेल्या 3 वर्षे बँका बागायतदारांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवत असल्याची कैफियत सभेत मांडण्यात आली. आंबा बागायतदार राजेंद्र कदम यांनी पिक विमा निकष बदलण्याची मागणी केली. कोकणची भौगोलिक परिस्थिती पाहता पिक विम्याचे निकष कोकणासाठी वेगळे असावेत, असे सांगितले. या प्रश्नांबरोरच बागायतदारांच्या प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली.









