जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचा आदेश : 235 दिवसानंतर पर्यटकांना प्रवासास परवानगी
प्रतिनिधी / मालवण:
जिल्हय़ातील सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी बोट वाहतूक सेवा सुरू करण्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मान्यता दिली आहे. कोविड-19 च्या अनुषंगाने राज्य शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांना अधिन राहून अटी व शर्तीनुसार ही मान्यता देण्यात आली आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे जिल्हाधिकारी हे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आल्या, त्यावेळी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी बोट वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती. किल्ला प्रवासी बोट वाहतूक सेवा सुरू करण्याची मागणी किल्ले प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत व संघटनेच्या सदस्यांनी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली होती. त्यानुसार आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. कोविड-19 च्या अनुषंगाने राज्य शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांस अधिन राहून, सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी बोट वाहतूक सुरू करण्यास खालील अटी व शर्तीनुसार जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मान्यता दिली आहे.
अटी, शर्ती पुढीलप्रमाणे
सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनने दर दिवशी एका बोटीच्या फक्त दोन फेऱया होतील, एवढय़ाच फेऱयांचे नियोजन करावे. प्रवासी वाहतूक करतेवेळी सामाजिक अंतर पाळावे, बोटी सॅनिटाईझ करणे, पर्यटकांना सुरक्षिततेच्या सूचना देणे, मास्क व सॅनिटाईझ वापर आदीबाबत नियोजन करण्याची जबाबदारी संस्थेची राहील. येणाऱया प्रवाशांना सामाजिक अंतर राखण्याबाबत सूचना देण्यात याव्यात, बुकिंग ऑफीसच्या ठिकाणी सामाजिक अंतर राखण्यासाठी खुणा करण्यात याव्यात, येणाऱया प्रवशांची सामाजिक अंतर राखून तपासणी करण्यात यावी, यामध्ये पर्यटकांचे तापमान, ऑक्सिजन पातळी तपासावी, येणाऱया प्रवाशांचे नाव, पत्ता, वय, तापमान व मागील 14 दिवसांच्या प्रवासाची माहिती रजिस्टरमध्ये नोंद करण्यात यावी, बुकिंग ऑफीस येथे पर्यटकांना ई-पेमेंट सुविधा देण्यात यावी. ऑनलाईन बुकिंगकरिता प्राधान्य देण्यात यावे, ज्या प्रवाशांना तापमान 38.0 किंवा 100.4 पेक्षा जास्त आहे व ऑक्सिजन पातळी 95 पेक्षा कमी असेल, अशा प्रवाशांना प्रवास करण्यापासून प्रतिबंध करण्यात यावा. ज्या पर्यटकांना कोविड 19 सदृश्य लक्षणे उदा. सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे असल्यास प्रवासासाठी प्रतिबंध करण्यात यावा व दवाखान्यात संदर्भित करण्यात यावे. तिकीट विक्री ठिकाणी असलेल्या कर्मचारी यांनी मास्क, ग्लोव्ज, फेसशिल्ड, सॅनिटायझर व सुरक्षा साधनांचा वापर करणे बंधनकारक राहील. बोटमन यांनी मास्क, ग्लोव्ज, फेसशिल्ड, सॅनिटायझर व सुरक्षा साधनांचा वापर करणे बंधनकारक राहील. येणाऱया सर्व प्रवासी यांनी मास्क, ग्लोब्ज, फेसशिल्ड, सॅनिटायझर व सुरक्षा साधनांचा वापर करणे बंधनकारक राहील. तिकीट मिळाल्यानंतर जेटीच्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळून बोट प्रवाशांना प्रवेश देण्यात यावा. गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. एका बोटीमध्ये सामाजिक अंतर पाळून जास्तीत-जास्त 6 पर्यटक व 1 चालक यापेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश देण्यात येऊ नये, सहली व अथवा मोठय़ा समूहांना (ग्रुप) ला एकत्रित प्रवास करण्यास प्रतिबंध करावा. प्रत्येक फेरीच्या वेळी बोट निर्जंतुक करणे बंधनकारक राहील, वेळोवेळी शासनामार्फत देण्यात येणाऱया सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील, प्रवासी बोट वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या घेणे बंधनकारक राहील. उपरोक्त नमूद अटी, शर्तीचा भंग केल्यास त्याचप्रमाणे विषाणू संसर्ग होईल, असे कोणतेही कृत्य केल्यास सदर परवानगी रद्द करण्यात येईल. तसेच संबधित व्यक्ती, संस्था, समूह यांच्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग नियंत्रण कायदा 1897 मधील तरतुर्दीप्रमाणे कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी, असे दिलेल्या आदेशात म्हटले आहे.









