देशमुखनगर / वार्ताहार
सातारा तालुक्यातील बोरगाव ते नांदगाव आणि निसराळे फाटा ते नांदगाव हे रहदारीचे रस्ते आहेत. या रस्त्यानी शेकडो लोक ये जा करत असतात. परंतु हे रस्ते प्रवास करण्यास योग्य राहीले नाहीत. बोरगाव ते नांदगाव आणि निसराळे फाटा ते नांदगाव या रस्त्याचे काम न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे. गेले काही दिवस हा रस्ता येण्या जाण्यासाठी योग्य नाही. या बाबत सा. बां. विभागाला कळवले असता निसराळे पुलावरील पाणी काढून देण्याचे फक्त नाटक केले गेले. लाॅकडाॅऊन व कोरोना महामारीमुळे अनेक कामे ठप्प झाली आहेत. तसेच यंदा पाऊस ही ऑगस्टपर्यंत पडला नाही. आता ऑगस्टच्या दुसर्या आठवड्यात पाऊस पडला आणि दोन दिवस झाले उगडला पण दहा दिवसात रस्ता इतका खराब झाला आहे की यावरुन येणे जाणे अवघड होऊन बसले आहे.
सा. बां. विभाग जाणीवपूर्वक ह्या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे. देखभाल आणि दुरुस्तीचे दोन वर्षांचे बिल घेऊन ठेकेदार बसले आहेत. आणि इकडे रस्ता दुरुस्तीच्या नावाने बोंब आहे. यावर तातडीने रस्ता दुरुस्त न झाल्यास स्वाभिमानी आंदोलन करणार आहे. या निर्णयास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजु केंजळे, महाराष्ट्र माथाडी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय निकम तसेच या विभागातील विविध पक्षांचे पदाधिकारी, सरपंच, संघटना यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे तातडीने दखल घेऊन रास्ता दुरुस्त न केल्यास आठ दिवसांत आंदोलन करण्यात येईल अशी माहीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजु शेळके यांनी दिली.









