ऑनलाईन टीम / मुंबई :
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत सादर करावेत, म्हणजे शेतकरी व गावकऱ्यांना तातडीने मदत करता येईल. विशेषत: रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब पडले असून महावितरणने तातडीने वीज पुरवठा सुरु करावा व प्रसंगी त्यासाठी इतर ठिकाणाहून जास्तीचे मनुष्यबळ, साधन सामुग्री उपलब्ध करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांनी घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे, नगर विकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब हे देखील सहभागी झाले होते. मुख्य सचिव अजोय मेहता यांनी देखील सूचना केल्या.
यावेळी ठाकरे म्हणाले, रायगड जिल्ह्यामध्ये घरांचे जे नुकसान झाले आहे, त्यांच्याकडे स्वयंपाक पाण्याची सोय नाही. त्यांना तातडीने अन्न धान्य पोहचविणे गरजेचे आहे. यंत्रणेने ते काम लगेच हाती घ्यावे. महावितरणाने अधिकचे मनुष्यबळ या भागात लावून वीज पुरवठा पहिल्यांदा सुरु करावा. रुग्णालये, दवाखाने यांना वीज पुरवठा सुरु राहणे गरजेचे आहे. नुकसान भरपाई देतांना नागरिकांना विश्वासात घ्या.
रायगड निवासी उपजिल्हाधिकारी डॉ पद्मश्री बैनाडे यांनी माहिती दिली की, रायगड जिल्ह्यात लाखो घरांचे नुकसान झाले आहे. १ लाखाहून जास्त झाडे पडली आहेत. श्रीवर्धन आणि मुरुडच्या मध्ये चक्रीवादळ धडकले, त्याचा फटका श्रीवर्धनला जास्त बसला असून सर्व दळणवळण ठप्प झाले आहे. विजेचे खांब हजारोंच्या संख्येने पडले आहेत. जिल्ह्यांत ५ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून पंचनाम्यासाठी पथके बाहेर पडली आहेत.









