रजनीश जोशी: तरुण भारत संवाद / सोलापूर
अँजियोप्लास्टी, मुतखडा आणि दर दोन दिवसाआड डायलेसिस असे उपचार वर्षानुवर्षे घेणार्या सोलापूरच्या कवी-नकलाकार माधव पवार यांनी कोरोनावर मात करून आपली विजिगिषू वृत्ती सिद्ध केली आहे. कोरोनावर चौदा दिवस उपचार घेऊन आज ते आपल्या निवासस्थानी परतले, तेव्हा शेजार्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले.
वयाच्या पासष्टीमध्ये त्यांनी दृढ निश्चयाने कोरोनाला पराभूत केले आहे. त्यामुळे अनेक व्याधी असलेल्या आणि साठी उलटलेल्यांना कोरोना त्रास देतो, हा सार्वत्रिक समजहि त्यांनी खोटा ठरवला आहे.
माधव पवार हे नाव सोलापूरकरांना नवे . ‘क्षणभर उघड नयन देवा’ सारखी अजरामर गीते लिहिणारे कवी रा. ना. पवार यांचे ते सुपुत्र आहेत. कविता, नकला आणि काव्य संमेलनांचे सूत्रसंचालक म्हणून त्यांचा लौकिक आहे. मागच्या दहा-पंधरा वर्षांपासून त्यांना अनेक व्याधींनी त्रस्त केले आहे. त्यात डायलेसिसमुळे त्यांच्या शरीरात अनेक ठिकाणी टोचवण्यात आले आहे. आजपर्यंत आठशेपेक्षा जास्तवेळा आपले डायलेसिस झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
पंधरा दिवसांपूर्वी सोलापूरच्या सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले होते, ‘‘डाॅक्टरांची कमतरता, सार्वजनिक अस्वच्छता आणि अन्य त्रुटी असूनहि आपण त्याकडे लक्ष दिले नाही. कोरोना घालवण्यासाठी मी सर्वशक्तीने प्रयत्न केले,’’ असे ते म्हणाले.

कवितेच्या चिंतनाने बरे केले – पवार
माझ्या वडिलांनी पेरलेले कवितेचे बीज फळाला आले. व्याधीग्रस्त असतानाही मी सतत कवितेचेच चिंतन केले. त्यामुळेच सगळ्या आजारांना परतवू शकलो. हास्य आणि कविता या दोन गोष्टींनी मी कोरोनाला हद्दपार केले.
माधव पवार, कवी-नकलाकार








